Corona officer
मुंबई, 26 मार्च : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यभरात नाइट कर्फ्यू जाहीर केला आहे. यादरम्यान नागरिकांना रात्रीचा प्रवासावर निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान आजही राज्यात कोरोना रुग्णसंख्येने रेकॉर्ड तोडला असून गेल्या 24 तासात 36,902 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज राज्यात 112 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यात मृत्यूदर 2.04 टक्के इतका आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी लॉकडाऊनचीही घोषणा करण्यात आली आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनने धुमाकूळ घातला असून वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे सरकारची चिंता वाढली आहे. मुंबई, पुणे, नागपूर या तीनही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. हे ही वाचा- देशातील कोरोनामुळे सरकारनं उचललं पाऊल, गृह मंत्रालयाचे राज्यांना निर्देश मुंबईत आज 5513 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय सध्या मुंबईत 37804 सक्रिय रुग्ण असून 43 कटेंन्टमेंट झोन जाहीर केले आहेत. त्याशिवाय मुंबईतील 497 इमारती सील करण्यात आल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत रुग्णांचा आकडा 5 हजारांहून अधिक आहे. ब्रिटनसारख्या देशात दुसरी लाट आल्यानंतर त्यांनी दोन अडीच महिन्याच्या लॉकडाऊन नंतर आता हळूहळू पुन्हा काही गोष्टी खुल्या करण्यास सुरुवात केली आहे. हीच परिस्थिती आता आपल्याकडे निर्माण होतांना दिसत आहे. धोका टळला नाही, उलट तो अधिक वाढला आहे हे जनतेने ही लक्षात घेण्याची गरज आहे. रुग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे, येत्या काळात ती आणखी किती वाढेल हे सांगता येत नाही. अशावेळी कडक उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावतांना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणे सांगून लॉकडाऊन लावा अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.