मुंबई, 29 जुलै: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल लागण्यास विलंब झाला आहे. त्यामध्ये सर्वात जास्त मार्क मिळवून देणारा वाटण्यासारखा भूगोलाचा पेपरही कोरोनामुळे रद्द झाला. आज दहावीचा निकाल असल्यानं विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक वाढली आहे.हा निकाल विद्यार्थी maharesult.nic. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर आणि News18 Lokmat या वेबसाईटवर देखील पाहू शकतात. निकालाआधी विद्यार्थी आणि पालक खूप ताण घेतात. हा ताण दूर करण्यासाठी काही खास टिप्स. मित्र-मैत्रिणींसोबत संवाद साधा - कोरोनामुळे प्रत्यक्षात भेटणं होऊ शकलं नाही तरी फोनवरून संपर्क साधा. तुमचा मूड हसरा ठेवतील अशा मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारा. ज्यांच्यासोबत बोलून मन मोकळं वाटेल आनंद मिळेल अशा लोकांना संपर्क करा. स्वत:बद्दल नकारात्मक विचार करू नका - आपल्याला हेच जमत नाही, तेच जमत नाही असा विचार करत बसू नका. स्वत:बद्दलची नकारात्मक भावना तणाव जास्त वाढवते. आपण केलेल्या चांगल्या गोष्टी, मिळालेलं यश आठवत राहा. पेपरमध्ये काय लिहिलं याची उजळणी नको- बऱ्याचदा पेपर संपल्यावर किंवा निकालाआधी आपण पेपरमध्ये काय लिहिलं आणि कसं लिहिलं या उत्तरांबद्दल घरच्यांशी किंवा मित्र-मैत्रिणींशी चर्चा करतो. हे करणं टाळा निकालाआधी या गोष्टी करू नका. आता काही क्षणात निकाल येणार आहे त्यामुळे लिहिलेलं बदलणार नाही. त्यामुळे आहे ती स्थिती स्वीकारून पुढे जा. इथे पाहा दहावीचा निकाल
थोड्या वेळ एकटे आणि शांत राहा - निकालाआधी अनेक लोकांशी उगाचंच चर्चा करून टेन्शन वाढतं. म्हणून थोडा वेळ तरी एकदम शांत बसा. मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका. शक्य असेल तर एकटेच एखादा फेरफटका मारून या. छंद जोपासा- निकालाआधी आपल्याला आवडणारी गोष्ट करा. आपल्यात एखादी कला असेल तर ती करा. ज्यातून आपल्याला सर्वाधिक आनंद मिळू शकेल अशी गोष्ट करा. सिनेमा पाहाणं किंवा गाणी ऐकल्यानं तणाव दूर होईल. योग आणि व्यायाम करा - योग आणि व्यायामानं मनावरचा तणाव हलका होतो. त्यामुळे रिझल्टच्या आदल्या दिवशी मेडिटेशन करा. साधे साधे व्यायाम म्हणजे धावणं, दोरीच्या उड्या करा. स्वत:लाच एखादी भेटवस्तू द्या - बाजारात जाऊन स्वत:साठी छोटीशी खरेदी करा. त्यानं मनाला नक्कीच आनंद मिळेल. चहा-कॉफी जास्त पिऊ नका - रिझल्टच्या आदल्या दिवशी चहा-कॉफी प्यायल्यानं तणाव जास्त वाढतो. तसं करू नका. उलट आवडते पदार्थ खा. पालकांनी विशेष काळजी घ्यावी - मानसोपचार तज्ज्ञांनी पालकांसाठीही काही गोष्टी सांगितल्यात. रिझल्टच्या दिवशी पालकांनी घरात खेळीमेळीचं वातावरण ठेवावं. पुन्हा पुन्हा रिझल्ट या विषयावर बोलू नये. महत्त्वाचं म्हणजे निकाल काही लागला तरी आम्हाला काही फरक पडत नाही, हा दिलासा पाल्याला द्यावा. करियरचे अनेक मार्ग - अनेकदा कमी मार्क मिळाले तर अॅडमिशन कशी मिळणार हे टेन्शन असतं. पण हल्ली करियरची क्षेत्र वाढलीयत. संधीही भरपूर उपलब्ध आहेत. मार्कांप्रमाणे कुठल्याही क्षेत्रात अॅडमिशन घेता येईल, हे पालक आणि मुलांनीही लक्षात ठेवावं.