मुंबई, 4 जून : श्रीलंका (Sri Lanka) सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. 1948 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सध्या श्रीलंका सर्वांत वाईट आर्थिक संकटातून जात आहे. देशात डॉलरची (Doller) तीव्र कमतरता निर्माण झाली आहे, त्यामुळे जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. परकीय चलनाचा साठा नसल्याने इंधन (Fuel), स्वयंपाकाचा गॅस (Gas) आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांच्या लांबचलांब रांगा पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. देशात खाद्यपदार्थांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातच या देशातील मुस्लिमांसाठी (Muslim) वाईट बातमी आहे. देश आर्थिक संकटात असल्याने श्रीलंकेतील मुस्लिमांना यंदा हजला जाता येणार नाही. श्रीलंकेची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. सौदी अरेबियाने (Saudi Arabia) श्रीलंकेच्या हज यात्रेकरूंचा कोटा मंजूर केला होता. मात्र, या यात्रेकरूंना पाठवण्यासाठी देशाकडे निधीच नाही. परिणामी, मुस्लिमांना यंदा हजला जाता येणार नाही. देशातील हज आयोजकांनी मुस्लिम समुदायाशी चर्चा करून या निर्णयाची माहिती दिली आहे. ‘आज तक’नं हे वृत्त दिलंय. गेल्या महिन्यात सौदी अरेबियाने श्रीलंकेतील 1,585 हज यात्रेकरूंचा कोटा मंजूर केला होता; पण यात्रेकरूंना जाता येणार नाही. देशातील सद्यस्थिती आणि येथील लोकांचे हाल लक्षात घेऊन श्रीलंकेतील ऑल सिलोन हज टूर ऑपरेटर्स असोसिएशन आणि हज टूर ऑपरेटर असोसिएशनच्या सदस्यांनी यंदा हजला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघटनांनी देशाच्या मुस्लिम धार्मिक व्यवहार विभागाला पत्र पाठवलं होतं. देशासमोरील गंभीर आर्थिक संकट पाहता या वर्षी हजला न जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पत्राद्वारे सरकारला देण्यात आली. या वर्षी श्रीलंकेतील हज यात्रेकरूंसाठी 1 कोटी डॉलर्सचा खर्च येणार होता, ही खूप मोठी रक्कम आहे. मात्र, देशातील परिस्थिती पाहता मुस्लिम समाजबांधव देशासाठी यंदाच्या हज यात्रेला जाणार नाहीत, असे असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. Turkey नाही तर Turkiye ‘या’ कारणामुळे एर्दोगन सरकारनं बदललं देशाचं नाव राजकीय पेचप्रसंग गंभीर श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे राजकीय संकटही अधिक गडद झाले असून, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आधीच 9 मे रोजी राजीनामा दिला आहे. सध्या देशातील महागाई दर सुमारे 40 टक्के आहे. खाद्यपदार्थ, इंधन, औषधे यांच्या तुटवड्यामुळे देशभरात निदर्शनं होत असून, श्रीलंकन रुपयाचं मूल्य सातत्यानं घसरत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांवर आपल्या जवळच्या दागिन्यांसारख्या मौल्यवान वस्तू विकण्याचीही वेळ आली आहे.