नवी दिल्ली, 10 जुलै : आपलं शेजारी राष्ट्र श्रीलंकेतील परिस्थिती (Sri Lanka Crisis) दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. काल संतप्त लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानावर हल्ला केला. श्रीलंकेतील वाढत्या अराजकतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मोठी भूमिका घेतली आहे. आम्ही श्रीलंकन जनतेच्या पाठीशी उभे आहोत, असे भारताने म्हटले आहे. त्याचबरोबर भारताने श्रीलंकेतील जनतेला लोकशाही मार्गाने त्यांचं ध्येय पूर्ण करण्यास सांगितले आहे. श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या अधिकृत निवासस्थानावर आंदोलकांनी ताबा मिळवला आहे. शनिवारीच आंदोलक राष्ट्रपती भवनाच्या स्विमिंग पूलमध्ये उड्या मारताना आणि पोहताना दिसले. आमच्या नेबरहुड फर्स्ट धोरणामध्ये श्रीलंकेचे मध्यवर्ती स्थान आहे, त्यामुळे भारताने या वर्षी श्रीलंकेला 3.8 अब्ज अमेरिकी डॉलर्सची मदत केली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी श्रीलंकेतील परिस्थितीवर सांगितले की, श्रीलंका आणि तेथील लोक ज्या आव्हानांना तोंड देत आहेत त्याची आम्हाला जाणीव आहे. अरिंदम बागची म्हणाले की, भारत आणि श्रीलंका हे जवळचे शेजारी आहेत. दोन्ही देशांमध्ये फार पूर्वीपासून चांगले संबंध आहेत. भारत श्रीलंकेच्या लोकांसोबत उभा आहे. कार,ण त्यांनी या कठीण काळावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.
सुमारे 2.2 कोटी लोकसंख्या असलेला श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. परकीय चलनाच्या तुटवड्याचा सामना करत असताना श्रीलंका सात दशकांतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीचा खर्चही देशाला भरता येत नाही. यामुळे लोक केंद्रीय नेतृत्वावर प्रचंड नाराज असून त्यांच्याविरोधात सातत्याने आंदोलने करत आहेत.
श्रीलंकेतील भयानक आर्थिक संकटानंतर नागरिकांचा उद्रेक; अखेर पंतप्रधानांची राजीनाम्याची घोषणा
श्रीलंकेतील आंदोलकांचा राष्ट्रपती भवनाला घेराव
आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या श्रीलंकेतील आंदोलनाची झळ राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनाही बसली आहे. आंदोलकांनी शनिवारी कोलंबोमधील राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. त्यानंतर गोटाबाया त्यांचे अधिकृत निवास्थान सोडून पळून गेले (Gotbaya Rajapaksa fleed from his own house) आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे. श्रीलंकेच्या अध्यक्षांवर आंदोलकांचा मुख्य राग आहे. त्यांनी राजीनामा द्यावा ही त्यांची प्रमुख मागणी होती. त्यानंतरही राजपक्षे राजीनामा न देण्यावर ठाम होते. आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये पद सोडणार नाही, असं त्यांनी जाहीर केलं होतं. अखेर त्यांना संतप्त आंदोलकांपासून वाचण्यासाठी घर सोडून पळावं लागलं आहे. अनेकांनी तर राष्ट्रपती भवनातील स्वीमिंग पुलमध्ये उडी मारली.