सलग पाचवा सामना जिंकून मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये दिली धडक
मुंबई, 15 मार्च : महिला प्रीमियर लीगमध्ये सलग पाचवा सामना जिंकून मुंबई इंडिअन्सच्या संघाने स्पर्धेत स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. आज मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियमवर महिला आयपीएलचा 12 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जाएंट्स यांच्यात पारपडला. या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीत कमाल कामगिरी करून मुंबईने गुजरात विरुद्धचा सामना जिंकला. यासह मुंबई इंडिअन्सचा संघ महिला आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरला आहे. सामन्याच्या सुरुवातीला मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकात 8 विकेट्स गमावून 162 धावांपर्यंत मजल मारली. यात हरमनप्रीतची अर्धशतकीय खेळी सर्वात लक्षवेधी ठरली. मुंबईने विजयासाठी दिलेले आव्हान पार करताना गुजरात जाएंट्सची मोठी दमछाक झाली. मुंबईच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे गुजरातचे फलंदाज मैदानावर फार काळ तग धरून राहू शकले नाही. गुजरातच्या स्नेह राणा, सुषमा वर्मा, एस. मेघना आणि हरलीन देओल या चार खेळाडूंनाच दोन अंकी धावसंख्या करता आली.
अखेर गुजरात संघाला 20 षटकात 9 विकेट्स गमावून 107 धावांपर्यंतहा मजल मारता आली आणि मुंबई संघाचा 55 धावांनी विजय झाला. यासह मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफमध्ये जाणारा पहिला संघ ठरला आहे. तर आता गुजरात संघाला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी यापुढचे सर्व सामने जिंकणं आवश्यक असणार आहे.