भारत-पाक सामन्याची तारीख बदलणार?
मुंबई, 26 जुलै : भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कप २०२३ मध्ये पहिला सामना गुजरातच्या अहमदाबादमधील स्टेडियमवर होणार आहे. मात्र या सामन्याच्या तारखेत आता बदल होण्याची शक्यता आहे. सुरक्षा एजन्सीने बीसीसीसीआयला तारीख बदलण्यास सांगितलं असल्याची माहिती समोर येतेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयला एजन्सीने तारीख बदलण्यास सांगितलं असून यावर बीसीसीआय़ची चर्चा सुरू आहे. लवकरच या संदर्भात निर्णय घेतला जाईल. आयसीसीने भारत पाकिस्तान सामना नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी खेळवण्याचा निर्णय घेतला होता. या दिवशी पूर्ण गुजरातमध्ये गरबा खेळला जातो. सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयला सामन्याच्या तारखेबाबत पुनर्विचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर तारीख बदलली तर अनेक चाहत्यांना याचा फटका बसू शकतो. सामन्यासाठी अनेकांनी त्यांचे शेड्युल तयार केले आहे. सामन्याची तिकिटेही बूक केली आहे.. आता भारत पाकिस्तान सामना १४ ऑक्टोबरला होईल असंही म्हटलं जात आहे. अद्याप तारखेबाबत बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रायुडूचं करिअर उद्ध्वस्त करणाऱ्या माजी BCCI अध्यक्षाचा मुलगा कुठे आहे? राज्यही सोडावं लागलेलं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सामन्याची तारीख बदलणं हे तितकं सोपं नाही. यामागे अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामुळे याबाबत चर्चा करूनच कोणताही निर्णय घेतला जाईल. जर गरज पडली तरी सुरक्षेच्या कारणास्तव तारीख बदलण्याची परिस्थिती उद्भवल्यास निर्णय घेतला जाईल. भारत पहिल्यांदाच क्रिकेटच्या इतिहासात पूर्ण वर्ल्ड कपचे आयोजन करत आहे. वर्ल्ड कपला ५ ऑक्टोबरला सुरुवात होणार असून १९ नोव्हेंबरला फायनल होणार आहे. यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना १५ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत खेळणार आहे. तर पाकिस्तान ६ ऑक्टोबरला हैदराबादमध्ये क्वालिफायर १ संघाविरुद्ध खेळेल. वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना ५ ऑक्टोबरला विजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर पहिली सेमीफायनल १५ नोव्हेंबर आणि दुसरी १६ नोव्हेंबरला होईल. दोन्ही सेमीफायनलमध्ये एक दिवस राखीव असणार आहे. तर फायनल १९ नोव्हेंबरला होणार असून यासाठीही राखीव दिवस असेल. तिन्ही सामने डेनाइट असतील.