Shoaib akhtar
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी: पाकिस्तानचा रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar )हा आपल्या कारकीर्दीत नेहमी वादग्रस्त राहिला होता. निवृत्तीच्या जवळपास अकरा वर्षानंतरही तो आपल्या अशाच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. नुकतेच त्याने पाकिस्तानची संस्कृती व खाण्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. लिजेंड क्रिकेट लीगमध्ये सहभागी झालेला शोएब अख्तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली याच्याशी संवाद साधत होता. यावेळी त्याने भारत आणि पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांमध्ये आक्रमकता आणि उर्जेचा फरक असल्याचे मत व्यक्त करत वादग्रस्त वक्तव्य केले. भारतीय संघ चांगले वेगवान गोलंदाज तयार करत आहे पण त्यांच्यात उर्जेचा अभाव आहे. भारतीय संघ उत्तम वेगवान गोलंदाज निर्माण करत आहे. पण भारतीय गोलंदाज पाकिस्तान गोलंदाजासारखे नाहीत. पाकिस्तानचे गोलंदाज अधिक धोकादायक आणि दमदार असतात त्याच कारण मांस. आमच्याकडे असलेले आदर्श, अन्न, पर्यावरण, दृष्टीकोन तसेच माझ्यासारखे लोक जे उर्जेने परिपूर्ण आहेत. वेगवान गोलंदाजी करण्यात आम्हाला आनंद मिळतो. तुम्ही जे खाता तेच बनता. आम्ही जनावरे खात असल्याने जनावरांसारखे बनतो. वेगवान गोलंदाजांचा विचार केला तर आम्ही सिंहासारखे धावतो. असे खळबळजनक विधान अख्तरे यावेळी केले. त्याचे हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. अख्तरने पाकिस्तानसाठी 46 कसोटी सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने आपल्या देशासाठी 163 एकदिवसीय आणि 15 टी-20 सामनेही खेळले आहेत. अख्तरने 1997 मध्ये पाकिस्तानकडून पदार्पण केले. तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने 444 विकेट्स घेतल्या आहेत.