IND VS AUS : ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्यासाठी आजारातून उठली हरमनप्रीत
मुंबई, 23 फेब्रुवारी : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी सेमीफायनलचा पहिला सामना पारपडणार आहे. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन बलाढय संघांमध्ये फायनल गाठण्यासाठी लढत होणार असून यापैकी एक संघ उद्या सामना जिंकून थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. तेव्हा फायनलच तिकीट मिळवण्यासाठी भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आजारातून उठून तब्बल पाच वेळा महिला टी 20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियासोबत दोन हात करणार आहे. भारतच्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर काही दिवसांपासून आजारी होती. तिला ताप येत असल्याने तिला हॉस्पिटलमध्ये देखील दाखल करण्यात आले होते. त्यामुळे ती कदाचित सेमी फायनल सामन्यात खेळणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र भारताचं महिला टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्णधार हरमनप्रीत आजारातून उठून ऑस्ट्रेलिया विरुद्ध पुन्हा मैदानात उतरली आहे.
टॉस जिंकल्यानंतर सेमी फायनलसाठी भारताची प्लेयिंग 11 जाहीर करीत असताना हरमनप्रीत कौरने सांगितले, “पूजा वस्त्राकरची तब्येत खराब आहे, त्यामुळे स्नेह राणा तिची जागा घेत आहे. अजून एक बदल आहे. राजा (राजेश्वरी गायकवाड) च्या जागी राधा (यादव) आहे. मला देखील ताप आला होता, पण आता मी बरी आहे. आम्हाला चांगली फलंदाजी करायची आहे म्हणूनच आम्ही सेमी फायनल सामन्यात आणखी एक फलंदाज जोडला आहे. तेव्हा देविका वैद्य हिच्या ऐवजी आम्ही यस्तिका भाटिया हिचा समावेश केला आहे. भारताची प्लेयिंग 11 : हरमनप्रीत कौर, रिचा घोष , शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, स्नेह राणा, शिखा पांडे, राधा यादव, रेणुका ठाकूर सिंग