मुंबई, 28 मे: भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि किदांबी श्रीकांत (Kidambi Srikanth) यांचं टोकयो ऑलिम्पिकसाठी (Tokyo Olympic) क्वालिफाय होण्याचं स्वप्न भंगलं आहे. सायना नेहवालसाठी तिच्या करियरमधलं हे शेवटचं ऑलिम्पिक ठरू शकलं असतं. आता ऑलिम्पिकसाठी कोणतीही क्वालिफिकेशन स्पर्धा होणार नाही, तसंच सध्याच्या क्रमवारीच्या यादीत कोणतेही बदल होणार नाहीत, असं विश्व बॅडमिंटन महासंघाने स्पष्ट केलं आहे. जागतिक क्रमवारीतला माजी नंबर वन खेळाडू श्रीकांत आणि लंडन ऑलिम्पिक (2012) मध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या सायना यांचं स्वप्न तेव्हाच तुटलं, जेव्हा कोरोना व्हायरसमुळे सिंगापूरमध्ये होणारी ऑलिम्पिक क्वालिफायर स्पर्धा रद्द करण्यात आली. यानंतर बॅडमिंटन विश्व महासंघाने टोकयो ऑलिम्पिक क्वालिफायिंगबाबत भविष्यात निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं, त्यामुळे या दोघांना ऑलिम्पिक खेळण्याची आशा होती. टोकयो ऑलिम्पिक क्वालिफायिंगचा कालावधी 15 जूनला संपत आहे, तसंच आता क्वालिफायिंग सामने खेळवण्यासाठी वेळही नाही, त्यामुळे आता रॅकिंगमध्ये बदल होणार नाही, असं महासंघाने स्पष्ट केलं. कोरोना संकटामुळे तीन स्पर्धा रद्द करण्यात आल्या, त्यानंतर क्वालिफिकेशनचा कालावधी दोन महिने म्हणजेच 15 जूनपर्यंत वाढवण्यात आला होता. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे इंडिया ओपन, मलेशिया ओपन आणि सिंगापूर ओपन या स्पर्धांचं आयोजन होऊ शकलं नाही. त्यामुळे श्रीकांत आणि सायनला क्वालिफाय होण्याची संधी मिळाली नाही. भारतासाठी सिंगलमध्ये पीव्ही सिंधू, (P V Sindhu) पुरुषांमध्ये बी साई प्रणीत आणि चिराग शेट्टी यांचं टोकयो ऑलिम्पिकसाठी क्वालिफिकेशन झालं आहे.