Ravi Shastri
नवी दिल्ली, 25 जानेवारी: टीम इंडियाच्या माजी दिग्गज खेळाडूंबाबत रवी शास्त्रींनी (Ravi Shastri) मोठं वक्तव्य केले आहे. त्यांनी गांगुली, द्रविड, लक्ष्मण आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासंदर्भात केलेलं वक्तव्य सध्या क्रिकेट जगतात चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच, मागे काय झाले याबद्दल मला बोलायचे नाही. असेदेखील त्यांनी आपल्या खास शैलीत वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले. टी-20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री आपल्याा पदावरुन पायउतार झाले. त्यांच्या कारकिर्दित संघाने परदेशात चांगली कामगिरी केली. संघाने ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकाही जिंकली (India vs Australia). त्यांची आणि विराट कोहलीची जोडीही हिट ठरली. पण कर्णधार म्हणून कोहलीलाही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या पराभवानंतर (South Africa) विराट कोहली आणि टेस्ट कॅप्टन्सी हा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे. दरम्यान, एक वृत्तवाहिनीशी बोलताना रवी शास्त्री यांनी मोठे विधान केले आहे. ‘इतक्या दिवसात कोणती टीम चांगली कामगिरी करू शकली आहे ते सांगा असा उलट सवाल उपस्थित करत गेल्या काही वर्षांत काही दिग्गज खेळाडूही वर्ल्ड कप जिंकू शकले नाहीत. सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे आणि रोहित शर्मा यांनाही विश्वचषक जिंकता आला नाही. याचा अर्थ तो वाईट खेळाडू आहे असा होत नाही.’’ सचिन तेंडुलकरलाही जिंकण्यापूर्वी 6 विश्वचषक खेळावे लागले होते.
तसेच तुमच्या कारकिर्दीमधील संघाचा अनुभवाबद्दल विचारले असता, मी 7 वर्षे संघासोबत होतो, आता मी 3 महिने विश्रांती घेणार आहे. त्यानंतर मी सध्या सुरू असलेल्या क्रिकेटबद्दल बोलेन. मागे काय झाले याबद्दल मला बोलायचे नाही. एक गोष्ट स्पष्ट आहे की मी सार्वजनिक ठिकाणी घाणेरडे कपडे धुत नाही. मला माझ्या कोणत्याही खेळाडूबद्दल सार्वजनिक चर्चा करायची नाही. अशा शब्दात त्यांनी आपले मत स्पष्ट केले.
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात सेंच्युरियनमधील विजयाने झाली होती, पण हा भारताचा या दौऱ्यामधील एकमेव विजय ठरला. कसोटी मालिकेत भारतीय संघाने पहिला सामना जिंकला आणि दक्षिण आफ्रिकेने शेवटचे दोन सामने जिंकत मालिका 2-1 ने आपल्या नावी केली. तसेच एकदिवसीय मालिकेत यजमान संघाने 3-0 ने मालिका नावावर केली. भारतीय संघ रविवारी केपटाउन येथे पार पडलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात विजयाच्या खूप जवळ पोहोचला होता. पण फक्त 4 धावांनी भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.