मुंबई, 30 नोव्हेंबर : आयपीएल 2022 साठी (IPL Players Retention 2022) दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंत, पृथ्वी शॉ (Prithvi Shaw), अक्षर पटेल (Axar Patel) आणि एनरिच नॉर्किया यांना रिटेन केलं आहे. तर श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे या दोन मुंबईकरांना आणि आर.अश्विनलाही डच्चू देण्यात आला आहे. याशिवाय आयपीएल गाजवणाऱ्या कागिसो रबाडा यालाही दिल्लीने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीची टीम आयपीएल 2020 फायनल खेळली, यानंतर आयपीएल 2021 च्या पहिल्या राऊंडआधी इंग्लंडविरुद्धच्या सीरिजदरम्यान श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली, त्यामुळे तो जवळपास 6 महिने क्रिकेटपासून लांब होता. त्याच्या गैरहजेरीमध्ये ऋषभ पंतला (Rishabh Pant) नेतृत्व देण्यात आलं. आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमध्येही अय्यरच्या पुनरागमनानंतर पंतकडेच टीमचं नेतृत्व कायम राहिलं. नव्या टीमचं नेतृत्व करण्यासाठी श्रेयस अय्यरने दिल्लीची टीम सोडण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने चार खेळाडूंना रिटेन केल्यामुळे त्यांना पंतला 16 कोटी, अक्षर पटेलला 9 कोटी, पृथ्वी शॉला 7.5 कोटी आणि एनरिच नॉर्किया याला 6.5 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. या चार खेळाडूंवर दिल्लीने 39 कोटी रुपये खर्च केले आहेत, त्यामुळे त्यांना लिलावात 47.5 कोटी रुपये वापरता येणार आहेत. जर एखाद्या टीमने 4 खेळाडू रिटेन केले तर त्या टीमला पहिल्या खेळाडूसाठी 16 कोटी रुपये, दुसऱ्या खेळाडूसाठी 12 कोटी रुपये, तिसऱ्या खेळाडूसाठी 8 कोटी रुपये आणि चौथ्या खेळाडूसाठी 6 कोटी रुपये कमी होतील. एखाद्या टीमने तीन खेळाडू रिटेन केले तर पहिल्या खेळाडूसाठी 15 कोटी, दुसऱ्या खेळाडूसाठी 11 कोटी आणि तिसऱ्या खेळाडूसाठी 7 कोटी रुपये द्यावे लागतील. दोन खेळाडू कायम ठेवले तर पहिल्या खेळाडूला 14 कोटी आणि दुसऱ्या खेळाडूला 10 कोटी तसंच एकच खेळाडू कायम ठेवला तर त्याला 14 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.