विराट कोहली - गौतम गंभीरमध्ये पुन्हा राडा! पहा मॅचनंतर मैदानावर नेमके काय घडलं?
मुंबई, 2 मे : क्रिकेट विश्वातील आक्रमक खेळाडू समजल्या जाणाऱ्या विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात क्रिकेटच्या मैदानावर अनेक वाद झाले आहेत. असाच प्रकार 1 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यातील सामन्यानंतर सुद्धा पाहायला मिळाला. आयपीएल 2023 मध्ये 43 व्या सामन्यात आरसीबीने लखनऊवर 18 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर मैदानावर भारतीय क्रिकेटमधील आजी माजी क्रिकेटर्समध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. लखनऊ सुपर जाएंट्सचे होम ग्राउंड असलेल्या एकना क्रिकेट स्टेडियमवर सोमवारी आरसीबी विरुद्ध लखनऊ या संघांमध्ये सामना पारपडला. या सामन्यात टॉस जिंकून आरसीबीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबीने फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 126 धावा केल्या. तर लखनऊला विजयासाठी127 धावांचे आव्हान मिळाले. लखनऊ सुपर जाएंट्सचा संघ आव्हान पूर्ण करण्यात अयशस्वी ठरला आणि त्यांचा 18 धावांनी पराभव झाला. या सामन्यानंतर मैदानावर आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि लखनऊ संघाचा मेंटॉर गौतम गंभीर या दोघांमध्ये वादावादी झाली.
झालं असं की, लखनऊचा खेळाडू कायले मायर्स विराटसोबत मॅचनंतर गप्पा मारत असताना गौतम गंभीर तेथे येऊन अचानकपणे आपल्या खेळाडूला घेऊन गेला. दरम्यान मॅचनंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांसोबत हात मिळवत असताना लखनऊचा गोलंदाज नवीन उल हकने विराटसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला अन् काही अपशब्द वापरले. विराटने त्याच्याकडे दुर्लक्ष केले असताना देखील पुन्हा नवीन विराटच्या अंगावर धावून गेला तेव्हा परंतु ग्लेन मॅक्सवेलने त्याला रोखले.
विराट आणि नवीन मधील हा वाद पाहताच गौतम गंभीर आक्रमक होऊन विराटच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होता. केएल राहुलने गंभीरला रोखण्याचा प्रयत्न केला परंतु अखेर गौतम गंभीर विराट पर्यंत पोहोचलाच. यानंतर विराट आणि गंभीरमध्ये बाचाबाची झाली. परंतु खरा वाद हा नवीन उल हक बाद झाल्यावरच झाला होता, कारण तो बाद झाल्यावर विराट त्याला काहीतरी बोलला होता. सध्या आरसीबी विरुद्ध लखनऊ यांच्यातील सामन्यानंतर मैदानावर झालेल्या या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.