विराट-नवीनचा वाद संपेना
मुंबई, 9 मे : विराट कोहलीसोबतचा वाद अफगाणिस्तानचा फास्ट बॉलर नवीन उल हकने जास्तच वैयक्तिक घेतला आहे. नवीनला हा वाद संपवायचा नाही का? असा प्रश्न विराटचे चाहते विचारत आहेत. नवीन उल हक हॉटेल रूममध्ये बसून मुंबई आणि आरसीबी यांच्यातली मॅच बघत होता. या सामन्यात विराट कोहली लवकर आऊट झाला. जेसन बेहरनडॉर्फने विराटला 1 रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यानंतर नवीन उल हकने विराटला डिवचलं आहे. नवीनने इन्स्टाग्राम स्टोरीवर पियुष चावलाचा फोटो शेअर करत विराटवर निशाणा साधला. नवीन उल हकने इन्स्टाग्राम स्टोरीवर आंबा खातानाचा फोटो शेअर केला आहे. यात समोर टीव्ही स्क्रीनवर मुंबई-आरसीबी सामन्यावेळी पियुष चावला दिसत आहे. या स्टोरीवर नवीन उल हकने ‘स्वीट मँगोज’ असं कॅप्शन लिहिलं आहे. विराटची विकेट आपण एन्जॉय केल्याचं नवीनने अप्रत्यक्षपणे त्याच्या स्टोरीतून सांगितलं आहे. नवीन उल हकच्या या पोस्टनंतर विराट कोहलीचे चाहते मात्र चांगलेच संतापले आहेत.
विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातला वाद लखनऊ आणि आरसीबी यांच्यातल्या सामन्यावेळी झाला. या सामन्यात विराटने नवीन उल हक आणि अमित मिश्राचं स्लेजिंग केलं. एवढच नाही तर कोहलीने नवीनला मारण्यासाठी बुट उचलल्याची अफवाही पसरली. मॅच संपल्यानंतर हँड शेक करताना नवीन उल हकने विराटचा बदला घेतला. नवीन उल हकने विराटचा हात सोडलाच नाही, यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर वादामध्ये लखनऊचा मेंटर गौतम गंभीरची एण्ट्री झाली. विराट कोहली आणि गौतम गंभीर 10 वर्षांनी पुन्हा एकदा आमने-सामने आले. या संपूर्ण प्रकरणात विराट आणि गौतम गंभीर यांची 100 टक्के मॅच फी कट करण्यात आली.