'दिल्लीतून पळून गेलेले भगोडे....' विराट सोबतच्या राड्यानंतर गौतम गंभीरच वादग्रस्त ट्विट
मुंबई, 4 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांच्यात झालेल्या भांडणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सामन्यानंतर मैदानात झालेल्या राड्यावरून सोशल मीडियावर विराट आणि गंभीरला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. अशातच पत्रकार रजत शर्मा यांनी गंभीरबाबत केलेल्या वक्तव्यावर आता गौतम गंभीरने ट्विट करत सडेतोड उत्तर दिले आहे. आयपीएल 2023 मधील 43 वा सामना आरसीबी विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात पारपडला. या सामन्यात आरसीबीने लखनऊचा 18 धावांनी पराभव करून विजय मिळवला. परंतु यानंतर मैदानावर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. लखनऊच्या फलंदाजी दरम्यान 17 व्या ओव्हरमध्ये विराट आणि नवीनमध्ये झालेलया वादाचे पडसाद सामन्यानंतर देखील उमटले. दोन्ही संघाचे खेळाडू हस्तांदोलन करत असताना लखनऊचा गोलंदाज नवीन उल हक रागात विराटवर धावून आला तर आपल्या संघातील खेळाडूसाठी गौतम गंभीरने देखील या वादात उडी घेतली. ज्यामुळे मैदानावर विराट कोहली आणि लखनऊचा मेंटॉर गंभीरमध्ये देखील वादावादी झाली.
विराट आणि गंभीरच्या भांडणाला दोन दिवस उलटून गेल्यावर सुद्धा त्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. अशातच बुधवारी पत्रकार रजत शर्मा यांनी गौतम गंभीर विषयी टीका केली. ते म्हणाले, “माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर निवडणूक लढवून खासदार झाला आहे, पण यासोबत त्याचा अहंकार देखील खूप वाढला. विराटची लोकप्रियता त्याला किती अस्वस्थ करते हे काल मैदानात पुन्हा एकदा पाहायला मिळालं. विराट कोहली खूप अग्रेसिव्ह खेळाडू आहे, तो चुकीची गोष्ट खपवून घेत नाही त्यामुळेच त्याने गौतम गंभीरला योग्य उत्तर दिले. शेवटी गंभीरने जे काही केलं ते खेळाडू वृत्तीच्या विरुद्ध आहे, असे व्हायला नको होते”.
यावर गौतम गंभीरने ट्विट करत रजत शर्माना प्रतिउत्तर दिले. तो ट्विट करत म्हणाला, " Man who ran away from Delhi Cricket citing “pressure” seems over eager to sell paid PR as concern for cricket! यही कलयुग़ है जहां ‘भगोड़े’ अपनी ‘अदालत’ चलाते हैं।" सध्या गंभीरचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.