मुंबई, 25 फेब्रुवारी : आयपीएल 2022 ला 26 मार्चपासून (IPL 2022) सुरूवात होणार आहे. आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी गुरूवारीच याची घोषणा केली. आयपीएलचे 70 पैकी 55 सामने मुंबईतल्या वानखेडे, ब्रेबॉर्न आणि नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियवर तर उरलेले 15 सामने पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर होतील. कोरोना व्हायरस आणि कठोर बायो-बबलमुळे प्रवास कमी करण्यासाठी आयपीएलचं आयोजन मुंबई-पुण्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएलची घोषणा होताच आता बीसीसीआयने (BCCI) आयपीएल कशी खेळवली जाईल हेदेखील जाहीर केलं आहे. यंदाच्या मोसमात 2 नव्या टीम दाखल झाल्यामुळे आता ही स्पर्धा 10 टीममध्ये असेल. या 10 टीमची विभागणी दोन ग्रुपमध्ये करण्यात आली आहे. आयपीएल टीमची संख्या वाढली असली तरी प्रत्येक टीम मागच्या मोसमांप्रमाणेच 14 सामने खेळणार आहे. क्रिकबझने याबाबतचं वृत्त दिलं आहे. आयपीएलच्या 10 टीमची 5-5 मध्ये विभागणी एकूण जिंकलेल्या आयपीएल ट्रॉफी आणि फायनलमध्ये मिळवलेला प्रवेश यानुसार करण्यात आली आहे. ग्रुप ए मध्ये मुंबई इंडियन्स, केकेआर, राजस्थान, दिल्ली आणि लखनऊ या टीम आहेत. तर ग्रुप बी मध्ये सीएसके, हैदराबाद, आरसीबी, पंजाब आणि गुजरातचा समावेश आहे.
ग्रुप ए | ग्रुप बी |
---|---|
मुंबई इंडियन्स | सीएसके |
केकेआर | हैदराबाद |
राजस्थान | आरसीबी |
दिल्ली | पंजाब |
लखनऊ | गुजरात |
ग्रुप ए मधल्या टीम एकमेकांविरुद्ध प्रत्येकी 2 मॅच खेळतील, तर ग्रुप बीविरुद्ध त्यांचा प्रत्येकी 1-1 सामना होईल, पण प्रत्येक टीम दुसऱ्या ग्रुपच्या त्यांच्या समोरच्या कॉलममधल्या टीमविरुद्ध दोन सामने खेळेल. म्हणजेच मुंबई इंडियन्स केकेआर, राजस्थान, दिल्ली आणि लखनऊ यांच्याविरुद्ध 2-2 मॅच खेळणार आहे, पण मुंबईच्या समोरच्या कॉलममध्ये ग्रुप बीमध्ये सीएसके असल्यामुळे मुंबई आणि सीएसके यांच्यात दोन सामने होतील. ग्रुप बीमधल्या हैदराबाद, आरसीबी, पंजाब आणि गुजरातविरुद्ध मात्र मुंबई एकदाच खेळेल.