ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटीत भारताचा विजयी चौकार! 2-1 ने मालिका घातली खिशात
मुंबई, 13 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने सलग चौथ्यांदा ऑस्ट्रेलियाचा कसोटी क्रिकेटमध्ये पराभव करत कसोटी मालिका 2-1 ने खिशात घातली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना पारपडला. आज या कसोटी सामन्याचा पाचवा दिवस होता. या सामन्यात पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावातील फलंदाजी सुरु होती. यावेळी त्यांनी 2 विकेट गमावून 175 धावा केल्या. परंतु त्यानंतर सुमारे सामना संपण्यास 1 तास शिल्लक असताना दोन्ही संघानी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. यामुळे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा सामना ड्रॉ झाला.
सोमवारी दुपारी 12 चाय सुमारास श्रीलंकेच्या न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यामुळे भारताने थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठली. इंदोर येथील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा सामान जिंकून ऑस्ट्रेलियाने सर्वप्रथम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवले होते. 7 जूनला लंडन येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना पारपडणार आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचा हा सलग चौथा विजय असून 2016 पासून भारताने ऑस्ट्रेलिया सोबत खेळलेले सलग चार सामने जिंकले आहेत. यातील दोन सामने भारताने त्यांच्या ऑस्ट्रेलियाच्या होम ग्राउंडवर तर दोन सामने आपल्या मायदेशात जिंकले आहेत.