साऊथम्पटन, 23 जून : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील फायनल मॅच (WTC Final) बुधवारी सहाव्या दिवशी देखील खेळली जाणार आहे. या मॅचमधील दोन दिवस पाण्यात गेले. तसेच उर्वरित तीन दिवसामध्येही पाऊस तसेच खराब हवामानाचा अडथळा होता. त्यामुळे आता फायनल निकाली लागावी म्हणून सहाव्या दिवशी देखील भारत आणि न्यूझीलंडच्या टीम मैदानात उतरतील. रंगतदार अवस्थेत फायनल पहिल्याच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सध्या रंगतदार अवस्थेत आहे. या टेस्टमध्ये टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये 217 रनवर ऑल आऊट झाली. न्यूझीलंडने 249 रन काढत 32 रनची आघाडी घेतली. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर इशांत शर्माला 3 विकेट मिळाल्या. आर.अश्विनला 2 आणि जडेजाला 1 विकेट घेण्यात यश आलं. न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनवेने सर्वाधिक 54 रन केले, तर कर्णधार केन विलियमसनने 49 रनची चिवट खेळी केली. पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 2 आऊट 64 रन केले होते. टीम इंडियाकडे सध्या 32 रनची आघाडी आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताला शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोन ओपनरच्या रुपात धक्के बसले. न्यूझीलंडच्या टीम साऊदीला या दोन्ही विकेट मिळाल्या. दिवसाअखेरीस चेतेश्वर पुजारा 12 रनवर तर विराट कोहली 8 रनवर खेळत आहे. आता सहाव्या दिवशी भारताचा विजय, न्यूझीलंडचा विजय किंवा ड्रॉ हे तीन्ही निकाल शक्य आहेत. पहिली चॅम्पियनशिप भारत जिंकणार की न्यूझीलंड? दोन्ही संघ संयुक्त विजेते ठरणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे सहाव्या दिवसाच्या खेळाला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. इतिहासाची पुनरावृत्ती, टीम इंडियाला पुन्हा महागात पडणार ती मोठी चूक! काय आहे अंदाज? इंग्लंडमधील हवामान खात्यानं क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बातमी दिली आहे. सहाव्या दिवशी साऊथम्पटनमधील आकाश स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. बुधवारी अगदी कमी किंवा कोणत्याही प्रकारचा पाऊस पडणार नाही. त्यामुळे क्रिकेट फॅन्सना दोन दिग्गज टीममधील थरारक झुंज सहाव्या दिवशी शेवटच्या बॉलपर्यंत अनुभवता येणार आहे.