मुंबई, 19 डिसेंबर : भारतीय टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) सध्या चांगलाच चर्चेत आहे. बीसीसीआयनं (BCCI) त्याच्याकडून वन-डे टीमची कॅप्टनसी काढून घेतल्यानंतर ही चर्चा सुरू आहे. विराट हा टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी भारतीय कॅप्टन आहे. त्याचबरोबर टीम इंडियाच्या सर्वात खराब कामगिरीची नोंदही त्याच्या कॅप्टनसीमध्ये झाली आहे. वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी (On This Day) भारतीय क्रिकेट टीमनं सर्वात लाजीरवाण्या रेकॉर्डची नोंद केली होती. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडलेडमध्ये झालेल्या टेस्ट मॅचमध्ये हा खराब रेकॉर्ड नोंदवला गेला होता. विराट कोहली या टेस्टमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन होता. या टेस्टमधील दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय टीम 36 रनवर ऑल आऊट झाली. हा टीम इंडियाच्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील एखाद्या टीमचा सर्वात कमी स्कोअर आहे. अॅडलेडमध्ये झालेल्या डे-नाईट टेस्टमध्ये विराटनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये 244 रन काढले. यामध्ये विराट कोहलीनं सर्वाधिक 74, चेतेश्वर पुडारा 43 आणि अजिंक्य रहाणेनं 42 रन काढले. त्याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग 191 रनवर संपुष्टात आली. त्यामुळे टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये आघाडी मिळवली होती. भारतीय टीम टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 19 डिसेंबर रोजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. एकाही बॅटरला दोन अंकी रन करता आले नाहीत. मयांक अग्रवालनं सर्वात जास्त 9 रन काढले. तीन जण शून्यावर आऊट झाले. विराट कोहली देखील फक्त 4 रनवर आऊट झाला.
ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवुडने 5 तर कमिन्सनं 4 विकेट्स घेतल्या. यजमान टीमनं 90 रनचं टार्गेट 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयानंतर ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी घेतली होती. पण, टीम इंडियानं नंतर मालिकेत पुनरागमन करत 4 टेस्ट मॅचची सीरिज 2-1 ने जिंकली.