कोलंबो, 23 जुलै: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील तिसऱ्या वन-डेमध्ये टीम इंडियानं 41 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. तीन वन-डे सामन्यांच्या या मालिकेतील पहिली वन-डे सात विकेट्सनं जिंकली होती. तर दुसऱ्या वन-डेमध्ये दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार (Deepak Chahar and Bhuvneshwar Kumar) यांनी जिद्दीनं खेळ करत भारताला विजय मिळवून दिला. तिसऱ्या वन-डेपूर्वीच मालिका जिंकल्यानं टीम इंडियानं या सामन्यात एकूण 6 बदल केले. त्यापैकी 5 जण तर वन-डेमध्ये पदार्पण करत आहेत. संजू सॅमसन (Sanju Samson), नितीश राणा (Nitish Rana), के. गौतम (K. Gowtham), राहुल चहर (Rahul Chahar) आणि चेतन सकारिया (Chetan Sakariya) या पाच जणांनी या वन-डेमध्ये पदार्पण केले आहे. त्याचबरोबर नवदीप सैनीलाही टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्धची दुसरी वन-डे जिंकलेल्या टीममधील इशान किशन, कृणाल पांड्या, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या सहा जणांना या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.
एकाच सामन्यात पाच जणांनी पदार्पण करण्याची ही 41 वर्षांनंतरची पहिलीच वेळ आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1980 साली मेलबर्नमध्ये झालेल्या वन-डे सामन्यात दिलीप दोशी, किर्ती आझाद, रॉजर बिन्नी, संदीप पाटील आणि टी. श्रीनिवासन यांनी वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर यंदा कॅप्टन शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) जोडीनं पाच जणांना वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली आहे. सुरेश रैनानंतर रविंद्र जडेजानं वापरलं ‘जातीय कार्ड’, सोशल मीडियावर troll भारताची Playing 11 शिखर धवन, पृथ्वी शॉ, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, के. गौतम, राहुल चहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया