मुंबई, 29 डिसेंबर : टीम इंडियानं (Team India) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या टेस्टवर (India vs South Africa) पकड मिळवली आहे. सेंच्युरियन टेस्टचा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय टीमकडे 146 रनची आघाडी आहे. ही आघाडी मिळवण्याचे मुख्य श्रेय फास्ट बॉलर मोहम्मद शमीला (Mohammed Shami) आहे. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर टेस्ट क्रिकेटमध्ये 200 विकेट्सचा टप्पा देखील पूर्ण केला. मोहम्मद शमीनं तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बॉलिंग कोच पारस म्हांब्रेसोबत (Paras Mhambrey) बीसीसीआय टीव्हीवर खास चर्चा केली. यावेळी त्याने 200 विकेट्स घेतल्यानंतर केलेल्या खास सेलिब्रेशनचे रहस्य सांगितले. शमीनं 200 विकेट्स घेतल्यानंतर आभाळाकडे पाहात हात हलवले होते. त्याने ही कृती करत वडिलांचे स्मरण केले. शमीच्या वडिलांचे 2017 साली निधन झाले आहे. शमीनं 200 टेस्ट विकेट्सही वडिलांना समर्पित केल्या आहेत. शमी झाला भावुक वडिलांच्या आठवणी सांगताना शमी यावेळी चांगलाच भावुक झाला होता. ‘मी आज जो काही आहे, ते वडिलांमुळे आहे. मी एका लहान गावातून आलो आहे. तिथं आजही खेळासंबंधी फार सुविधा नाहीत. माझे वडील मला कोचिंग कँपला नेण्यासाठी 30 किलोमीटर सायकल चालवत. मला त्यांनी केलेले कष्ट आजही आठवतात. त्या परिस्थितीमध्ये, त्या दिवसात त्यांनी माझ्यात गुंतवणूक केली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.’ असे शमीने सांगितले.
टेस्ट क्रिकेटमध्ये 200 विकेट्सचा टप्पा ओलांडल्याबद्दल शमीने सांगितलं की, ‘तुम्ही छाप पाडण्यासाठी संघर्ष करत असता तेव्हा भविष्य काय आहे, याचा विचार केलेला नसतो. सुरूवातीला तुमचे स्वप्न हे फक्त भारतासाठी खेळणे आणि ज्यांना फक्त ड्रेसिंग रूममध्ये पाहिलं अशा खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणे हे असते. तुमच्या हातामध्ये फक्त कष्ट करणे आहे. त्यासाठी तुम्ही घाम गाळला तर त्याचे फळ तुम्हाला मिळते,’ असे शमीने यावेळी स्पष्ट केले. IND vs SA Weather Forecast: चौथ्या दिवसावर काळ्या ढगांचं सावट, पुन्हा होणार पावसाचा खेळ?