मुंबई, 05 एप्रिल: आज महाराष्ट्रात हवामानाचं विषम वातावरण (Weather in Maharashtra) असण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवासांपासून विदर्भात सुरू असलेला सुर्याचा प्रकोप (temperature rise in Vidharbha) आजही कायम असणार आहे. आज विदर्भासहित महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेच्या लाटेच्या (Heat Wave) इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भकरांना तीव्र उकाड्याच्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. पुढील 24 तासांत दक्षिणपूर्व राजस्थान, तामिळनाडू आणि पूर्व विदर्भातील नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागात पुढील चोवीस तासांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडल्यास उष्माघातासारख्या आजारांना सामोरं जावू लागू शकतं. त्यामुळे आवश्यक कारणासाठी घराबाहेर पडत असाल, तर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला वेधशाळेनं दिला आहे.
विदर्भात सुर्याचा प्रकोप सुरू असला, तरी महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यात मात्र ऐन उन्हाळ्यात पावसाळी हंगामाप्रमाणे वातावरण निर्माण झालं आहे. आज सकाळी कोकण पट्ट्यात ढगाळ हवामान नोंदलं गेलं आहे. हवामान खात्यानं उपग्रहाद्वारे क्लिक केलेल्या, एका उच्च दर्जाच्या फोटोमध्ये ढगाळ वातावरण स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांतही कोकणातील लोकांना आज पावसाळा हंगामातील दिवसांचा अनुभव मिळणार आहे.
(वाचा- राज्यावर कोरोनाचे संकट गडद, एकाच दिवसात 57 हजार रुग्णांची भर! ) मुंबई आणि पुण्यातील मधल्या पट्ट्यातही ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पुण्यावरून मुंबईकडे किंवा मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. पाऊस पडण्याची शक्यता नसली, तरी या भागातील ढगाळ वातावरणामुळे नागरिकांमध्ये दडपण आहे. त्यामुळे तुम्ही आज मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करणार असाल तर योग्य ती काळजी घेऊन प्रवास करावा.