बंगळुरू, 2 ऑक्टोबर : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या तपासातील दिरंगाईवरून दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांनी थेट पंतप्रधान मोदींवरच निशाणा साधलाय. गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी सरकार काहीच करत नाही खंतवजा तक्रार त्यांनी व्यक्त केलीय. एवढचं नाहीतर सरकारने मारेकऱ्यांना पकडण्यासाठी ठोस कार्यवाही केली नाहीतर आपल्याला मिळालेले 5 राष्ट्रीय पुरस्कार आपण परत करू, असा इशाराही त्यांनी दिलाय. तसेही मोदी आपल्यापेक्षा उत्तम अभियन करताहेत. माझे पुरस्कार त्यांना देण्यास काहीच हरकत नाही, असा टोमणाही त्यांनी पंतप्रधानांना लगावलाय. गौरी लंकेश या आपल्यासाठी अतिशय जवळच्या व्यक्ती होत्या. त्यांच्या हत्येनं आपण अतिशय दुःखी झालो असून त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत मोदींनी सोईस्करपणे बाळगलेलं मौन खेदजनक असल्याचं प्रकाश राज यांनी म्हटलंय.