नालासोपारा, 26 एप्रिल : वसई-विरार शहर महानगरपालिकेचे तुळींज रुग्णालयाचे कोविड रुग्णालयात रुपांतर केल्याने सामान्य रुग्णांचे अतोनात हाल होत आहे. सर्वत्र कोविड रुग्णालये झाल्याने सामान्य रुग्णांचे हाल सुरू आहे. सर्वसामान्य रुग्ण मात्र बेडची मागणी करीत फिरत आहे. वसई विरारमध्ये सध्या कोरोनाने हाहाकार माजवला असताना सामान्य रुग्णांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. नालासोपारा पूर्वेकडील विजय नगर येथील तुळींज रुगणालयात दररोज 350 ओपीडी, 130 महिन्याला डायलिसीस, एक्सरे 120, रक्त तपसणी 250, एन आय सीयू 7 बेड, आयसीयू 7, फ्रॅक्चर , हर्निया अशा 5 ते 6 शस्त्रक्रिया प्रत्येक महिन्याला होत असतात. तसंच 300 जणांचे लसीकरण होत होते. मात्र वसई विरार शहर महानगरपालिकेने तुळींज रुग्णालय कोविड केल्याने अनेकांचा जीव टांगणीला लागला आहे. विरारमध्ये राहणाऱ्या सावित्री चव्हाण यांना रात्री 2 च्या सुमारास छातीत दुखू लागले आणि श्वास कोंडल्यासारखं झाल्याने त्यांना विरारच्या निस्वार्थ रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांची ऑक्सिजन लेवल 80 ते 82 टक्के होती. त्यांच्याकडे अतिदक्षता विभागात बेड उपबल्ध नसल्याचे सांगून इतरत्र नेण्याचा सल्ला दिला. तेथून सावित्री चव्हाण यांना नालासोपारा येथील रिद्धी विनायक रुग्णालयात नेले. तेथे त्यांची ऑक्सिजन लेवल 98 ते 97 टक्के होती. तेथून नालासोपारा पूर्वेकडील विनायक रुग्णालयात नेले असता त्यांनी बेड उपलब्ध नसल्याने कोणतेही उपचार न करता दुसरीकडे जाण्याचा सल्ला दिला. तेथून रुग्णवाहिकेतून पालिकेच्या वरुण इंडस्ट्रीजच्या कोविड सेंटर येथे नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांचा रक्तदाब 187 झाला होता. तेथे त्यांना औषध देण्यात आलं. हे ही वाचा- कोरोना लशीबाबत मोठा निर्णय होणार? लस उत्पादक कंपन्यांकडे केंद्राने केली एक मागणी दुसरीकडेही त्यांना हेच उत्तरं मिळतं होती. दरम्यान पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी सुरेखा वाळके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोनला प्रत्युत्तर दिलं नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही. वसई विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात ठेके पद्धतीवर काम करणाऱ्या डॉक्टरांवर धुरा असल्याने सगळा सावळा गोंधळ सुरू असून चुकीच्या पद्धतीने बदली केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. ज्या ठिकाणी स्त्री तज्ज्ञांची गरज आहे, तेथे दुसऱ्या डिग्रीचे डॉक्टर दिल्याने मोठा अनर्थ घडत असल्याची चर्चा आहे. सरकारने वसई विरारमध्ये पालिकेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी शासनाने भर्ती करावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष रुग्ण सेवक जतीन वालकर यांनी मागणी केली आहे.