08 डिसेंबर : चार राज्यांच्या विधानसभेच्या निकालांमुळे निराशा झाली. लोक असमाधानी आहेत नाही तर असे निकाल आले नसते. जनतेचा कौल आम्हाला मान्य असून पराभव स्विकारतो आता पक्षाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं मत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं.
तसंच त्यांनी विरोधी पक्षांचं अभिनंदनही केलं आणि या निवडणुकीत प्रचारात मेहनत घेतल्याबदल काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि नेत्यांचे आभारही मानले. चार राज्यांच्या विधानसभा निकालावर सोनिया गांधी आणि राहुल गांधी माध्यमांना प्रतिक्रिया देताना पराभवाचं दुख लपवू शकले नाही.
या निकालांच्या माध्यमातून जनतेनं एक संदेश दिलाय. पण कोणतीही निवडणूक ही स्थानिक प्रश्नावर,मुद्यावर लढवली जाते. त्यामुळे याची लोकसभेच्या निवडणुकीशी तुलना करता येणार नाही असंही त्या म्हणाल्यात.तसंच योग्य वेळी आम्ही आमचा पंतप्रधानाचा उमेदवार जाहीर करु असंही सोनियांनी स्पष्ट केलं.
तर राहुल गांधी यांनी शीला दीक्षित यांची पाठराखण करत त्यांनी उत्तम काम केलं अशी पावती दिली. या निकालातून आम्हाला एक संदेश मिळाला असून तो मी मनापासून ऐकलाय. काँग्रेस जनतेच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम पक्ष असून ते पूर्ण करण्यात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. आम आदमी पार्टीत लोकांचा सहभाग होता जो प्रस्थापितांकडे नाही. आजपर्यंत दिल्लीत दोन पारंपारिक पक्षात निवडणुकी झाल्यात. आम आदमीने लोकांना आपल्याजवळ केलं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे अशी ग्वाहीही राहुल यांनी दिली.