नवी दिल्ली, 30 जुलै: पाच दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि (Mamata Banarjee) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट का होऊ शकली नाही, याची जोरदार चर्चा सध्या राष्ट्रीय राजकारणात सुरु आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पाच दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर (Delhi tour) होत्या. या दरम्यान शरद पवारदेखील दिल्लीतच होते. मात्र तरीही या दोन नेत्यांची भेट न होण्यामागे अनेक काऱणं (Various reasons) असू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. ममतांच्या भेटीगाठी 26 जुलैपासून दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. याशिवाय काँग्रेस नेते कललनाथ, आनंद शर्मा, अभिषेक मनु सिंघवी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, द्रमुकच्या नेत्या कनिमोझी या सर्वांची ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली. 2024 ची तयारी आणि वातावरण निर्मिती म्हणून या भेटीकडं पाहिलं गेलं. मात्र विरोधकांच्या आघाडीतील प्रमुख नाव असणाऱ्या शरद पवारांना मात्र त्या भेटल्या नाहीत. भेट न होण्यामागची कारणं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शरद पवार हे गेले 5 दिवस दिल्लीतच होते. मात्र दोन्ही बाजूंकडून ही भेट घडवून आणण्यासाठी पुढाकारच घेतला न गेल्यामुळे ही भेट झाली नसल्याचं सांगण्यात येतंय. विरोधकांच्या आघाडीचं नेतृत्व कोण कऱणार, यासाठी ममता बॅनर्जी आणि शरद पवार या दोन तुल्यबळ नावांची चर्चा सुरु आहे. असं असताना ही भेट न झाल्यामुळे सर्व काही आलबेल नसल्याचीही चर्चा सुरु झाली आहे. मात्र ही चर्चा अनावश्यक असून नुकतीच तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांनी नुकतीच पवारांची भेट घेतली असल्यामुळे या न झालेल्या भेटीची फार चर्चा करण्याची गरज नसल्याचं तृणमूलच्या वतीनं सांगितलं जात आहे. मोदींच्या भेटीचा परिणाम? नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली होती. त्यानंतर शरद पवारांच्या भविष्यातील भूमिकेबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यामुळे सध्या ममता बॅनर्जींनी ही भेट टाळली असावी, अशी चर्चा आहे. शुक्रवारी सकाळी शरद पवार दिल्लीबाहेर पडले, तर दुपारनंतर ममता बॅनर्जी बंगालला परतणार आहेत.