तीनही दत्तक मुलींचा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सख्ख्या मुलींप्रमाणे सांभाळ केला. तिघींची लग्नही एकाच मांडवात रीतसर करून देऊन त्यांची बिदाई केली.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दत्तक घेतलेल्या तिन्ही मुलींची एकाच दिवशी, एकाच मांडवात लग्न लावून दिली. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव कार्तिकेय आणि कुणाल यांनी अगदी खरेदी पासून ते लग्नाच्या विधींपर्यंत सर्व जबाबदाऱ्या उत्तमरीत्या पार पाडल्या.
बाढच्या गणेश मंदिरात हा लग्नसोहळा झाला. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि त्यांची पत्नी साधना यांनी जातीने सर्व विधींमध्ये भाग घेतला.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी स्वतः नवरदेवाच्या वरातीचं स्वागत केले. वऱ्हाड घेऊन तीनही वर मंदिराच्या आवारात पोहोचताच सीएम शिवराज, कार्तिकेय आणि कुणाल यांनी त्यांचं स्वागत केलं.
'माझ्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. जे सक्षम आहेत त्यांनी अनाथ मुलींचं संगोपन आणि दत्तक घेण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे', असं या वेळी मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 1998 मध्ये या प्रीती, राधा आणि सुमन या तिघींना दत्तक घेतलं. त्या वेळी त्या फक्त फक्त 2 ते 3 वर्षांच्या होत्या. तिघीही विदिशाच्या सेवा आश्रमात राहात होत्या. त्यांची सर्व जबाबदारी शिवराजसिंग आणि त्यांची पत्नी साधना यांनी घेतली.
मुख्यमंत्र्यांनी तिन्ही मुलींची लग्न पूर्ण रीतीरिवाजांनुसार केली. नवीन आणि आनंदी आयुष्यासाठी त्यांना शुभ आशीर्वादही दिला.