पाटना 31 ऑक्टोबर: बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. संरक्षणमंत्री राजनाथसिंह ( Defence Minister Rajnath Singh ) यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर सर्वात मोठा हल्लाबोल केला आहे. चीनवरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं होतं. त्यावर बोलताना सिंह म्हणाले, मी खुलासा केला तर यांना तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही. राजनाथ सिंह यांची शनिवारी पाटण्यात रॅली झाली. त्यावेळी झालेल्या सभेत त्यांनी हा हल्लाबोल केला. ते म्हणाले, काही राजकीय पक्ष आणि नेते सैनिकांच्या शौर्य आणि पराक्रमावर संशय घेत आहेत. चीनने भारताची जमीन बळकावली असं सांगत आहेत. पण मी जर खुलासा केला तर यांना तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही. राहुल गांधी गेले अनेक दिवस सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर चीनच्या मुद्यावरून टीका करत आहेत. त्यांनी 1962च्या युद्धाचाही संदर्भ देत सांगितलं की 1962 पासून भारतीय सैनिकांनी देशाची मान उंचावली आहे.
दरम्यान, भारत आणि चीन मध्ये सुरू झालेला सीमा वाद (India-China Border Dispute) आता 8 महिन्यांनंतही कायम आहे. दोन्ही देशांच्या राजकीय (Foreign Ministers) आणि लष्करी अधिकाऱ्यांमध्ये (Military Commanders) चर्चेच्या 7 फेऱ्या झाल्या आहेत. मात्र अजुनही तोडगा निघाला नाही. भारताने संयम दाखवत नरमाईची भूमिका घ्यावी असा गोडीगुलाबीचा सूर चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी लावल्याचं सूत्रांनी सांगितलं मात्र भारतीय अधिकाऱ्यांनी कावेबाज चीनचा डाव ओळखून आधी तुम्ही मागे फिरा असं निक्षून सांगत दणका दिला आहे. कमांडर स्तरावरच्या अधिकाऱ्यांच्या चर्चेच्या 7 फेऱ्या झाल्या असून 8वी फेरी नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला होण्याची शक्यता आहे. 7व्या फेरीच्या चर्चेत भारतीय अधिकाऱ्यांनी चीनला थेट सुनावलं आहे. आधी तुम्ही आक्रमकतेची सुरुवात केली आता आम्ही मागे हटणार नाही. आधी तुम्ही माघारी फिरा मगच शांतता निर्माम होऊ शकते असं भारतीय अधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितलं आहे.