नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) अध्यक्षतेखाली झालेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (United Nations Security Council) बैठकीत सागरी सुरक्षा वाढवण्याच्या मुद्द्यावर एकमत झाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्यत्व भारताला मिळाले असून त्यानंतरच्या पहिल्या ऑनलाईन बैठकीचे अध्यक्षपद भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवले. सुरक्षा परिषदेच्या विविध सदस्य देशांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.
सागरी सुरक्षा आणि समुद्रातील गुन्हेगारी हा सर्वच देशांपुढे असणारा महत्त्वाचा मुद्दा असून त्यावर सर्वांनी मिळून उपाय करणे गरजेचं असल्याचा मुद्दा पंतप्रधान मोदींनी मांडला. त्यावर इतर देशांच्या प्रतिनिधींनीही आपली मतं नोंदवली. समुद्री चाचेगिरी हा पूर्ण जगासमोरील गंभीर विषय असून केवळ एखादा देश यावर उपाययोजना करण्यात पुरा पडत नसल्याचं निरीक्षण या बैठकीत नोंदवण्यात आलं. समुद्राशी संबंधित पारंपरिक आणि अपारंपारिक धोक्यांचा विचार करून त्यावर सर्वसमावेशक तोडगा काढण्यावर या बैठकीत एकमत झाले. याबाबत भारताच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी SAGAR या प्रकल्पाची माहिती देत सिंधू संस्कृतीच्या काळापासून समुद्राबाबत भारताचं उदार आणि सर्वसमावेशक धोरण कसं होतं, याची माहिती दिली. सागरी सुरक्षा वाढवणे, समुद्रातील परस्पर व्यापाऱ्याच्या संधी वाढवणे तसंच परस्पर सहकार्याने देशाच्या सीमांचं संरक्षण करणे यासारख्या मुद्द्यांवर या बैठकीत सहमती झाली. परस्पर सहकार्याने व्यापार, संरक्षण आणि पर्यटनास चालणा देण्याच्या मुद्द्यावरही या बैठकीत सहमती झाली. हे वाचा - भाजप नेते आणि त्यांच्या पत्नीची गोळी घालून हत्या; दहशतवादी हल्ल्यानंतर खळबळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या चर्चासत्राचं अध्यक्षपद भूषवणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.