नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : केवळ ई-व्हेईकल्ससाठी (E-Vehicles) दिल्ली ते मुंबई (Delhi to Mumbai) नवा एक्सप्रेस वे (Express Way) सध्या साकार होत आहे. याचं काम जलदगतीनं सुरू असून लवकरच प्रवाशांना त्यावरून प्रवास करता येणार आहे. देशातील केवळ इलेक्ट्रिक वाहनांसाठी तयार होणारा हा पहिला महामार्ग असेल. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना या मार्गावर प्रवेश दिला जाणार नाही. असा आहे प्रकल्प दिल्ली ते मुंबई नवा एक्सप्रेस वे सुरू होत असून 2023 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. 1350 किलोमीटर लांबी असणाऱ्या या मार्गाचं नाव ‘ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे’ असं असणार आहे. या रस्त्याचं सुमारे 350 किलोमीटरचं काम पूर्ण झालं असून 2023 साली हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. हे आहेत फायदे या महामार्गामुळे दिल्ली आणि मुंबईतील अंतर 150 किलोमीटर कमी होणार आहे. दिल्ली आणि मुंबईला जोडणाऱ्या एऩएच-8 वर सध्या वाहनांची संख्या वाढत असून या नव्या महामार्गानंतर त्या रस्त्यावरील ताण कमी होणार आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला नव्या औद्योगिक वसाहती आणि स्मार्ट सिटीज उभारण्याची सरकारची योजना आहे. या महामार्गामुळे नवी शहरं निर्माण होणार असून उद्योगांनाही चालना मिळणार असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे. या महामार्गामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. तर प्रदुषणही कमी व्हायला मदत होणार आहे. या हायवेमुळे दरवर्षी 32 कोटी लिटर इंधनाची बचत होणार आहे. त्याचप्रमाणं दरवर्षी 85 कोटी किलो कार्बनडाय ऑक्साईडचं उत्सर्जन वाचणार आहे. कोरोनामुळे झाला उशीर या महामार्गाचं काम कोरोनामुळं रखडल्याचं दिसून येत आहे. कोरोना काळात कामगार आणि मजूर घरी निघून गेल्यामुळे रस्ता बांधणीचं काम रखडलं होतं. आता पुन्हा या कामानं वेग घेतला आहे. हे वाचा - कोरोनाच्या दोन डोसनंतर आता BOOSTER DOSE ची गरज? वाचा, तज्ज्ञांचं नेमकं मत कुठल्या राज्यात किती किलोमीटर दिल्ली ते मुंबई हा महामार्ग एकूण पाच राज्यांतून जाणार आहे. त्यामध्ये एनसीआर-हरियाणात 137 किलोमीटर, राजस्थानमध्ये 374 किलोमीटर, मध्यप्रदेशमध्ये 245 किलोमीटर, गुजरातमध्ये 423 किलोमीटर तर महाराष्ट्रात 171 किलोमीटर असा एक्सप्रेस वे असणार आहे.