ram mandir
मुंबई, 28 जानेवारी : 1 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिर दर्शनासाठी खुलं केलं जाईल, अशी घोषणा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे. तेव्हापासून ‘रामलला’ मंदिरात विराजमान होण्याची रामभक्त आतुरतेनं वाट पाहत आहेत. देशातील आणि जगातील कोट्यवधी भाविक या दिव्य राम मंदिराच्या दर्शनासाठी आतुर आहेत. राजस्थानमधील बन्सी पहाडपूर येथील दगडांचा वापर करून अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाचं भव्य मंदिर उभारलं जात आहे. ट्रस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात कोरीव दगड बसवले जात आहेत. हे दगड भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरतील. राम मंदिरातील गाभाऱ्याचं बांधकाम वेगानं सुरू आहे. मंदिराच्या बांधकामात वापरलेल्या दगडांवर अगोदर कोरीव काम केलं जात आहे. त्यानंतर त्यावर नगारा शैलीत डिझाइन केलं जात आहे. मंदिराच्या भिंती आणि खांबांवर चक्र, शंख, गदा, फुलांसह विविध देव-देवतांच्या मूर्ती कोरल्या जात आहेत. यासाठी राजस्थानमध्ये तीन आणि अयोध्येत एक कार्यशाळा चालवली जात आहे. येथे हजारो कामगार रात्रंदिवस दगडांवर कोरीवकाम करत आहेत. एवढंच नाही तर गाभाऱ्यात कोरीव दगडांचे आठ थर बसवण्यात आले आहेत. त्याचबरोबर गाभाऱ्याभोवती चार मीटर रुंदीचा प्रदक्षिणा मार्ग तयार करण्यात येत आहे. हेही वाचा - दक्षिण आफ्रिकेच्या चित्त्यांना मिळणार नवीन घर, मोदी सरकारने तयार केला नवा प्लॅन रामसेवकपुरममध्ये दगडांचा साठा रामजन्मभूमी अयोध्येत भव्य मंदिर उभारणीच्या कामाला वेग देण्यात आला आहे. यासोबतच रामजन्मभूमी संकुलात तटबंदीचं कामही सुरू करण्यात आलं आहे. मंदिराच्या परिसरामध्ये वीज आणि पाणी पुरवठ्यासाठी प्लांट उभारण्याची तयारी सुरू आहे. एकाचवेळी अनेक कामं सुरू असल्यामुळे रामजन्मभूमी संकुलात दगड ठेवण्याची समस्या निर्माण झाली आहे. राम मंदिराच्या तळमजल्यावरील छतासाठी वापरले जात असलेले कोरीव दगड आता अयोध्येतील रामसेवकपुरम कार्यशाळेत साठवले जात आहेत. दगडांच्या अनेक खेपा अयोध्येत पोहोचल्या आहेत. राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील रुपवास भागात असलेला बन्सी पहाडपूरचा लाल आणि पांढरा दगड जगभर प्रसिद्ध आहे. पहाडपूरच्या दगडाचं वैशिष्ट्य म्हणजे तो हजारो वर्षे खराब होत नाही किंवा त्याची चमकही लवकर जात नाही. प्राचीन इमारतींपासून ते आधुनिक काळातील मंदिरं आणि हॉटेल्स बांधण्यासाठी या दगडाचा वापर झाला आहे. राम मंदिर, अक्षरधाम मंदिर, विधानसभा, संसद, हॉटेल्स इत्यादींबरोबरच प्राचीन राजवाडे, मंदिरं आणि किल्ल्यांमध्येही याचा वापर करण्यात आला आहे. या दगडांना पाच हजार वर्षांपेक्षा जास्त काळाचा इतिहास आहे. हा दगड जितका जास्त पाऊस सोसतो तितका जास्त चमकतो.