कोलकाता 15 मार्च : गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) सोमवारी पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यातील रानीबांध येथे पोहोचले (Amit Shah In Bengal). याठिकाणी सभेदरम्यान जनतेला संबोधित करताना त्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येचा मुद्दा काढला. गृहमंत्री म्हणाले, की तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांच्या पायाला झालेली दुखापत हल्ला असल्याचं त्या सांगतात. निवडणूक आयोगानं हा केवळ अपघात असल्याचं सांगितलं. शाह म्हणाले, की दिदी तुम्ही व्हीलचेअरचा वापर करत इकडे तिकडे फिरत आहात. मला तुमच्या पायाच्या वेदनेची खरच काळजी वाटते. मात्र, तुम्हाला 130 भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येचं थोडं तरी दुःख आहे का? गृहमंत्री म्हणाले, की आम्हाला आशा होती की कम्युनिस्ट सरकार गेल्यानंतर राजकीय हत्यांचे प्रमाण कमी होईल. मात्र, टीएमसी सरकारनं तर कम्युनिस्टचं चांगलं असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. राजकीय हिंसा आणखीच वाढली. 130 हून अधिक भाजप कार्यकर्त्यांची हत्या केली गेली. शाह म्हणाले, की लोकांनी टीएमसीला माता, माती आणि माणसांचं सरकार बनवण्यासाठी निवडून दिलं. त्यांना आशा होती, की राजकीय हिंसा कमी होईल. मात्र, झालं याउलट. हिंसा आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला. शाह म्हणाले, एक काळ असा होता, जेव्हा देशाच्या जीडीपीमध्ये 25 टक्के हिस्सा बंगालचा असायचा. मात्र, आता हा आकडा प्रचंड ढासळला आहे. शाह म्हणाले, मोदींनी असं वचन दिलं आहे, की ते सोनार बांग्ला बनवणार. पुढे ते म्हणाले, बंगालमध्ये दुर्गा पूजा करायची असली तरी कोर्टात जावं लागतं. ते म्हणाले, बांकुरामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. आमचं सरकार स्थापन होताच लवकरात लवकरच पेयजल कनेक्शन दिले जातील, असं आश्वासनही त्यांनी दिलं