मुंबई 18 नोव्हेंबर: एकीकडे वीज देयकात सवलत देता येणार नसल्याचं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट करुन राज्यभरातील वीज ग्राहकांना शॉक दिला आहे. त्याचवेळी गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेने घरगुती वीज बिलात 30 टक्के कमी करु असं वचन दिलं होतं याची आठवण सोशल मीडियावर करु दिली जात असतानाच भाजपनेही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. हे सरकार गोंधळलेलं असून ते पाडण्याच्या भानगडीत आम्ही पडणार नाही असं चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. शिवसेनेने वचननाम्यात काय म्हटलंय ते विसरले आहेत आणि अगदी कोरोना काळात दिलेलं आश्वासनही ते विसरले आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. पाटील म्हणाले, हे सरकार सातत्याने गोंधळलेल्या स्थितीत आहे. कायम विरोधाभास दिसतो आहे. लोकांचा मनात गोंधळ आणि अस्वस्थता आहे. लोकांच्या सहनशक्तीचा अंत होत चाललेला आहे. शाळेंच्या बाबतीतही गोंधळ झाला आहे. आता सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरेल. मराठा आरक्षण असो की कोणताही विषय काहीच ताळमेळ नाहीये. यांची पॅकेजेस हवेत आहेत. पालघर प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी ही सर्वसामान्यांची आहे. मराठा आरक्षण असो की कोणताही विषय कोणताही ताळमेळ नाहीये. आमच्या खुशाल चौकशा करा, आम्ही दिवसभर काम करुन रात्री शांतपणे झोपतो. कांजुरच्या जागेत गुंतागुंत असल्यानेच तिथे कारशेड करायचं नाही असा आम्ही निर्णय केला होता. आत हे सरकार कायदेशीर गोष्टीत अडकणार. यांना कोर्टच परवानगी देणार नाही.