मतदान करण्यासाठी याचिका दाखल केली मात्र, त्यावर आता उद्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
मुंबई, 09 जून : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election 2022) मतदानाला आता अवघे काही तास उरले असताना महाविकास आघाडी सरकारला धक्का बसला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना हायकोर्टानेही दिलासा दिला नाही. मतदान करण्यासाठी याचिका दाखल केली मात्र, त्यावर आता उद्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला देशमुख आणि मलिक यांच्या मतावर पाणी फेरावे लागणार आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आमदार हे अटकेत आहेत. त्यामुळे या आमदारांनाही निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी याचिकेवर नुकतीच मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करण्याची परवानगी नाकारली आहे. त्यानंतर देशमुख आणि मलिक यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली. राज्यसभेकरता मतदान करण्यासाठी परवानगी अर्ज तातडीने दाखल करण्यात आला. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या कोर्टात हा अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने दोघांची मागणी फेटाळली होती. आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याने मतदानाचा अधिकार आरोपीला नसतो ( हायकोर्ट ) त्यांना जामिनावर सोडावे लागेल आणि जामिनाकरता वेगळ्या कोर्टात जावे लागेल पण तुमची मागणी असेल तर सकाळी ऐकतो तुमचे प्रकरण, असं म्हणत न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी दिलासा दिला. पण, आता अनिल देशमुख आणि मलिक यांना परवानगी मिळणार ही आशा जवळपास संपुष्टात आली आहे. कारण प्रक्रियेनुसार यांना पॅरेंट कोर्टात म्हणजे ज्या कोर्टात प्रकरण सुरु आहे. त्या कोर्टातूनच त्यांना आधी जामीन घ्यावा लागेल. नंतर त्यांना मतदानाकरता जाता येईल. म्हणजे या दोघांना ईडी न्यायालयात जावे लागेल. पण ईडी न्यायालयाने आधीच त्यांची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे अनिल देशमुख आणि मलिक यांना मतदानाचा हक्क बजावता येणे आता अशक्य झाले आहे.