राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचा मविआचा प्रस्ताव, पण भाजपच्या मनात काय? वाचा INSIDE STORY
तुषार रूपनवर, प्रतिनिधी मुंबई, 3 जून : राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) महाराष्ट्रातील सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या या सहा जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. भाजपने (BJP) तिसरा अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवला आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणूक होणार आणि घोडेबाजार होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. हेच लक्षात घेता आज मविआ (MVA) नेत्यांचं शिष्टमंडळ हे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) भेटीला पोहोचले आहेत. या भेटीत मविआच्या नेत्यांनी भाजपला एक प्रस्ताव दिला आहे. काय आहे मविआचा प्रस्ताव? देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपचे नेते यांच्यात चर्चा सुरू आहे. या बैठकीत भाजपला प्रस्ताव देण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून भाजपला राज्यसभा आणि विधान परीषद निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपने त्यांच्या तिसऱ्या उमेदवाराचा अर्ज मागे घ्यावा… जेणेकरून राज्यसभा निवडणूक बिनविरोध होईल. तसेच महाविकास आघाडीकडून भाजपला विधानपरिषद निवडणुकीचाही प्रस्ताव देण्यात आला आहे. भाजपला विधानपरिषदेची पाचवी जागा देणार आणि ती निवडणूक भाजप 5, महाविकास आघाडी 4 अशी बिनविरोध करण्याचा प्रस्ताव आहे. वाचा : राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात मोठी घडामोड, मविआचं शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला भाजपच्या मनात चाललंय काय? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार लढवण्यावर भाजप ठाम आहे. तिसऱ्या उमेदवारासाठी मतांची जुळवाजुळव झाल्याचाही भाजपच्या सूत्रांचा दावा आहे. राज्यसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जर भाजपने आपल्या तिसऱ्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला नाही तर मग प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडेल आणि त्यावेळी राज्यसभेच्या सहव्या जागेसाठी शिवसेना विरुद्ध भाजप असा अटी तटीचा सामना बघायला मिळणार आहे. भाजपचे राज्यसभेसाठी उमेदवार भाजपकडून अखेर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून माजी रेल्वे मंत्री पियूष गोयल ( Piyush Goyal) आणि डॉ. अनिल बोंडे (anil bonde) यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच, भाजपकडे तिसऱ्या जागेसाठीही उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. कोल्हापूरमधून धनंजय महाडिक (dhananjay mahadik) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपची बैठक राज्यसभा निवडणुकीसंदर्भात भाजपने शुक्रवारी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडणार आहे. विशेष म्हणजे, आज (3 जून) राज्यसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या बैठकीला महत्त्वा प्राप्त झाले आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील,आशिष शेलार, प्रविण दरेकर, प्रसाद लाड उपस्थित राहणार आहे.