दिल्लीत उष्णतेमुळे लोकांचे हाल होत असले तरी, मुंबईत मात्र हवामान चांगलं आहे. मान्सूनची चाहुल लागली आहे. अनेक भागात जोरदार पाऊस झाला. जोरदार वारे वाहत आहेत. मात्र, पावसाळा सुरू झाल्याने काही भागात परिस्थिती दयनीय झाली आहे. नाशिकमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, हवामान खात्याचं म्हणणं आहे की, मान्सूनची गाडी मुंबई स्थानकापर्यंत पोहोचण्यास थोडा विलंब होण्याची शक्यता आहे.
नैऋत्य मान्सून 11 जूनपर्यंत मुंबईत पोहोचेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पूर्वी वर्तवला होता. मात्र आता 15 जूनच्या दुपार किंवा सायंकाळपर्यंत पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्याचं विभागाचं म्हणणं आहे. गेल्या 24 तासांत जुहू विमानतळ परिसरात 56 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या वर्षी 11 जूनच्या अधिकृत तारखेच्या दोन दिवस आधी 9 जूनला मान्सून मुंबईत दाखल झाला होता. तोपर्यंत शहरात 100 मिमी पाऊस झाला होता.
शुक्रवारी दक्षिण मुंबईत मुसळधार पाऊस झाला. स्कायमेट वेदरने दिलेल्या माहितीनुसार, हा पहिला मान्सूनपूर्व पाऊस होता. यादरम्यान मुंबईतील सांताक्रूझ येथे 15 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरात सायंकाळी आणि रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. मुंबई शहरातील अनेक भागात शनिवारीही पाऊस झाला. वडाळा परिसरात रस्ते जलमय झाले होते.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये ऑटोवर दोन मोठी झाडे उन्मळून पडली. ऑटोमधील एका प्रवाशाचा आणि ऑटो चालकाचा मृत्यू झाला. उर्वरित 2 प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे ठाण्यात एक झाड उन्मळून टेम्पोवर पडलं. माजिवडा परिसरातील लोढा पॅराडाईजजवळ टेम्पो उभा होता. या घटनेत कोणतीही दुखापत झाल्याचं वृत्त नाही.