मुंबई, 26 जून: मुंबईतील प्रसिद्ध असलेले ताज हॉटेलला (Taj Hotel Mumbai) आज दुपारच्या सुमारास एक धमकीचा फोन (Threat Call) आला आण एकच खळबळ उडाली. हॉटेलमध्ये बंदूकधारी दहशतवादी शिरणार असल्याचं म्हटलं. या घटनेनंतर तात्काळ पोलीस आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथक हॉटेल परिसरात दाखल झाले. पोलिसांच्या तपासात ताज हॉटेल आणि परिसरात बॉम्ब किंवा दहशतवादी नसल्याचं उघड झालं. पोलिसांनी यानंतर माहिती काढली की, हा फोन कॉल कुठून आला होता आणि कोणी केला होता त्यावेळी आणखी धक्कादायक माहिती समोर आली. धमकीचा हा फोन कॉल पश्चिम महाराष्ट्रातील सातारा (Satara) जिल्ह्यातून आल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आले. इतकेच नाही तर धमकीचा फोन कॉल हा चक्क एका 14 वर्षीय मुलाने केल्याचंही तपासात समोर आलं आहे. ईडीच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड; अनिल देशमुखांसह मुलगा ऋषिकेश अडचणीत? साताऱ्यातील कराड येथील या मुलाने हा फोन कॉल केला होता. याबाबत त्या मुलाच्या वडिलांची चौकशी केली असता आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान पोलीस या मुलाची सध्या विचारपूस करत असून अधिक चौकशी करत आहेत.
26/11 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी ताज हॉटेलला टार्गेट केलं होतं. या हॉटेलमध्ये उच्चभ्रू नागरिक, मोठ-मोठ्या कंपन्यांच्या मीटिंग होत असतात आणि त्यामुळे येथे नेहमीच चोख सुरक्षा व्यवस्था असते. पण आज अचानक धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती. या संदर्भात ताज हॉटेलने एक प्रेस रिलिज काढत म्हटलं, आज सकाळच्या सुमारास धमकीचा कॉल आल्यावर तात्काळ अधिकाऱ्यांना याबाबत कळवण्यात आले. अधिकाऱ्यांनी सर्व ठिकाणी तपास केला असता हा फोन कॉल फेक असल्याचं समोर आलं. आमच्या हॉटेलमधील सर्व पाहुणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती मार्गदर्शक तत्वे पाळली जात आहेत.