मुंबई, 19 जुलै : मुंबई ठाण्यासह उपनगर आणि नवी मुंबईत मुसळधार पावसानं अगदी जोर धरला आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या धो धो पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. तर लोकल मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अंबरनाथ बदलापूर रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. त्यामुळे लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. बदलापूरहून सीएसएमटीच्या दिशेनं वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे पनवेल ते बेलापूर मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
वसई विरार मध्येही कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाची दमदार बॅटिंग सखल भागात पाणी साचलं आहे. सकाळी 6 वाजल्यापासूनच जोरदार पाऊस सुरू झाल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. मुसळधार पावसामुळे नागिनदास पाडा, विजयनगर टाकी रोड, आचोळे रोड, जया पॅलेस परिसर जलमय झाला आहे.
वसई-विरारच्या सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरदेखील पाणी साचल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. या ठिकाणी पाणी साचले आहे सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना तारेवरची कसरत करीत रेल्वे स्टेशन गाठावे लागत आहे .