JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / महाविकास आघाडीची तज्ज्ञांची कमिटी तयार, राज्यसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारण्यासाठी रणनीती ठरली

महाविकास आघाडीची तज्ज्ञांची कमिटी तयार, राज्यसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारण्यासाठी रणनीती ठरली

महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक झाली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 जून : राज्यसभा (Rajya Sabha Election 2022) आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या  (MLC Election 2022) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) घटक पक्ष कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर (Varsha Bungalow) बैठक झाली. या बैठकीत सुरुवातीला राज्यसभेच्या संख्याबळाच्या गणितावर चर्चा झाली. मतांची जुळवाजळव करण्यासाठी तज्ज्ञ कमिटी ठरविण्यात आली आहे. ही कमिटी पक्षांना मतदान कसे करायचे याबाबत मार्गदर्शन करणार आहे. या बैठकीत घटक पक्षांबाबतही चर्चा झाली. विशेष म्हणजे आपली मतं फुटणार नाहीत याची काळजी घेण्याची गरज आहे, असा सूर बैठकीत होता. राज्यसभेच्या निवडणुकीच्या संख्या बेरजेचं गणित जुळल्यानंतर पक्षांनी व्हीप काढत आपल्या पक्षातील आमदारांची काळजी घ्यायची हे बैठकीत ठरविण्यात आलं, अशी माहिती सूत्रांनी दिली. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज भाजप (BJP) नेत्यांना भेटलं. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्याबाबतचा प्रस्ताव भाजप नेत्यांसमोर मांडला. पण भाजपने हा प्रस्ताव धुडकावला. त्यामुळे आता मतांचं जमवाजमव करण्यासाठी महाविकास आघाडी कामाला लागली आहे. महाविकास आघाडीचे दिग्गज मंत्री आणि नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत रणनीती आखण्याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री सुनील केदार, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अनिल परब, शिवसेना खासदार अनिल देसाई, संजय राऊत वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. या सर्व दिग्गज नेत्यांनी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. ( ‘मला सगळे विचारतात की तुमचं काय होणार…’, पंकजांचं स्वत:च्या राजकीय वाटचालीबाबत महत्त्वाचं विधान ) संध्याकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास या बैठकीला सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरु होती. जवळपास एक तास ही बैठक चालली. राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जूनला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूक (Rajya Sabha and MLA Election) बिनविरोध करण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न संपले आहेत. शिवसेना आणि भाजप यापैकी कोणताही पक्ष माघार घेण्यास तयार नाहीय. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि पंरपरा आहे की, राज्यसभा निवडणुक सर्व पक्षीय सांमज्यसाने बिनविरोध करण्याची… मात्र भाजप आणि काँग्रेस पक्षांच्या आडमुठे धोरणामुळे अखेर राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदानाची वेळ आली आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान होणार असल्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होणार हे आता उघड झालं आहे. राज्यसभा निवडणूक होणारच आहे तर त्या पाठोपाठ विधान परिषदेसाठीही प्रत्यक्ष मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीचा रणसंग्राम 1) राज्यसभेच्या 57 जागांच्या सदस्यांचा कार्यकाळ 4 जुलै रोजी संपत आहे. 2) केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीची घोषणा केली असून, त्यासाठी 24 ते 31 मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख होती. 3) अशा स्थितीत उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी 1 जूनला झाली, तर 3 जून रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येण्याची मुदत होती. 4) राज्यसभेसाठी 10 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत विधान भवनात मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजेपासून मतमोजणी सुरू होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या