मुंबई, 5 ऑगस्ट : मुंबईत लवकरच म्हाडाच्या (Mumbai MHADA Lottery) 8 हजार घरांची (8 thousand houses) लॉटरी (Lottery) काढण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली आहे. 23 ऑगस्टपासून (23 August) यासाठीचे फॉर्म (Form) मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. या घोषणेमुळे मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी एक आशेचा किरण निर्माण झाला असून त्याबाबतच्या इतर तपशीलांची नागरिक प्रतीक्षा करत आहेत. याबाबतची अधिक माहिती https://www.mhada.gov.in/ या वेबसाईटवर मिळू शकेल. कुठे असणार घरं? ही घरं वसई, विरार, कल्याण, मीरा रोड आणि ठाणे या परिसरात असणार आहेत. आर्थिक मागास प्रवर्ग, लोअर इन्कम ग्रुप आणि मिडल इन्कम ग्रुपसाठी ही घरं असतील. 23 ऑगस्टपासून याचे फॉर्म मिळणार असून दसऱ्याच्या मुहूर्तावर लॉटरी काढली जाणार आहे. म्हाडाच्या लॉटरीचं महत्त्व मुंबईत स्वतःचं घर असावं, असं मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण होण्याची आशा म्हाडाच्या घरातून पूर्ण होते. आतापर्यंत हजारो मुंबईकरांना म्हाडाच्या मार्फत पक्की घरं मिळाली आहेत. मुंबईत खासगी बिल्डरकडून घर विकत घेणं सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही. मुंबईतील जागांचे दर नेहमीच सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असतात. मुंबईत घर खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण व्हायचं असेल, तर सामान्यांना म्हाडाच्या लॉटरीवरच अवलंबून राहावं लागतं. काय म्हणाले आव्हाड? लवकरच मुंबईत 8 हजार घरांसाठीची लॉटरी प्रक्रिया सुरु होणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. या प्रक्रियेसाठी 23 ऑगस्टपासून फॉर्मची विक्री सुरु असणार असल्याची माहितीदेखील त्यनी दिली आहे. हे वाचा - रावसाहेब दानवेंचं मुंबई लोकलबाबत मोठं विधान, राजेश टोपेंनी दिलं उत्तर घरांचा दर्जा सुधारणार म्हाडाची घरे खासगी इमारतींच्या तुलनेत निकृष्ट दर्जाची असल्याच्या तक्रारी वारंवार रहिवाशांकडून केल्या जातात. बांधकामात वापरलं जाणारं साहित्य निकृष्ट दर्जाचं असणं, घराचा ताबा मिळाल्यानंतर काही दिवसांतच इमारतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याचं लक्षात येणं, छत गळणं या आणि अशा विविध प्रकारच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येतात. स्वस्तातील घरे असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर निकृष्ट दर्जाचा आणि स्वस्तातला माल वापरत असल्याची तक्रारही केली जाते. मात्र यापुढे अशा कुठल्याही तक्रारी येणार नाहीत, याची खबरदारी घेणार असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे. ज्या बिल्डरला हे घरं बांधण्याचं कंत्राट मिळेल, त्याला ते घर उत्कृष्ट दर्जाचं असावं, असं बंधन घालण्यात येईल, अशी माहितीदेखील आव्हाड यांनी दिली आहे.