पुढील दोन-तीन तासांत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे.
मुंबई, 21 सप्टेंबर: गेल्या आठवड्यापासून राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झालं आहे. त्यामुळे मागील 4-5 दिवसांपासून राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy to very heavy rainfall) पावसानं हजेरी लावली आहे. यानंतर आता हवामान खात्याने (IMD) पुढील 48 तासांसाठी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज केवळ आठ जिल्हे वगळता राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची (Rain in maharashtra) शक्यता आहे. उद्याही राज्यात कमी अधिक प्रमाणात राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने आज कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला, परभणी आणि नांदेड हे आठ जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी वेगवान वाऱ्याच्या साथीने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील वाशीम, यवतमाळ, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरी कोसळणार आहेत. संबंधित जिल्ह्यांत राहाणाऱ्या नागरिकांना हवामान तज्ज्ञांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच आकाशात विजा चमकत असताना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हेही वाचा- कोरोनामुक्त रुग्णाला काढावी लागली किडनी आणि फुफ्फुस; जगातील पहिलं प्रकरण भारतात उद्याही राज्यात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. उद्या जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे सात जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे. उद्या पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. त्यानतंर राज्यात हळुहळू पावसाचा जोर कमी होणार आहे. तर विकेंडला पुन्हा राज्यातून मान्सून गायब होण्याची शक्यता आहे. हेही वाचा- ‘Corona Vaccination म्हणजे स्कॅम’ म्हणत या अभिनेत्याने नाकारली लस IMDने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पूर्व राजस्थान आणि लगतच्या मध्य प्रदेशाच्या काही भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. तसेच बंगालचा उपसागर आणि उत्तर ओडिशा-पश्चिम बंगाल-बांगलादेश किनारपट्टीवर चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. पण येत्या काळात बंगालच्या उपसागरातील चक्रीय वाऱ्याची स्थिती मंदावणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.