एकनाथ शिंदेंनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये राजकीय आकसापोटी आमदारांची सुरक्षा काढल्याचा आरोप केला आहे.
मुंबई, २५ जून : शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारसमोर (mva government) मोठे संकट उभे ठाकले आहे. एकीकडे, महाविकास आघाडीने कायदेशीर लढाईला मार्ग स्विकराला आहे तर आता एकनाथ शिंदे यांनीही अधिक आक्रमक होत शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. एकनाथ शिंदे यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच एक खरमरीत पत्र लिहिलं आहे. विशेष म्हणजे, यावेळी आमदारांची संख्याच दाखवून शिंदेंनी पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शन केलं आहे. शिवसेनेच्या आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत किती आमदार आहे, असा सवाल विचारला जात आहे. खुद्ध शिंदे यांनी याआधी ३३ आमदार असल्याचे पत्र समोर आणले होते. आता ३८ आमदारांच्या सहीसह पत्रच शिंदेंनी समोर आणून महाविकास आघाडीला आव्हान दिले आहे.
एकनाथ शिंदेंनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये राजकीय आकसापोटी शिवसेनेतील एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची सुरक्षाव्यवस्था काढली आहे. आता त्यांच्या कुटुबियांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असणार आहे. आमदारांच्या कुटुंबीयांना धमकवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोपच शिंदेंनी केला आहे.
एवढंच नाहीतर, संजय राऊत यांनी मुंबईत येऊन अधिवेशनात संख्याबळ सिद्ध करून दाखवाच असं आव्हान दिले होते. संजय राऊत हे आम्हाला धमकी देत आहे, आमदारांच्या कुटुंबीयांना काही झालं तर मुख्यमंत्री,शरद पवार, आदित्य ठाकरे, संजय राऊत जबाबदार असणार आहे,असा आरोपच शिंदेंनी केला आहे.