मुंबई, 14 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसच्या रुग्णात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गुढीपाडवा मेळावा रद्द करण्याची घोषणा केली आहे. मनसेनं आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून गुढीपाडवा मेळावा रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. ‘कोरोना’चं सावट गडद आहे. त्यामुळे ह्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द करत आहोत’, असं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच, ‘येत्या काही आठवड्यात महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. पण, एकूण परिस्थिती पाहता सरकारने या निवडणुका किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलाव्यात.’ अशी मागणीही मनसेनं केली.
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, अशी सुचना राज्य सरकारकडून देण्यात आली होती. त्यामुळे, मनसेकडून औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी करणार असल्याचं घोषित करण्यात आलं होतं. परंतु, कोरोना व्हायरसमुळे मनसेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. सरकारच्या आदेशानंतर काय-काय बंद होणार? दरम्यान, कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 13 मार्च रोजी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ‘पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळा बंद करण्यात येतील. तसंच 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा वगळता या दोन शहरांतील शाळा बंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. जे नागरिक आजपासून परदेशातून मुंबईत येतील त्यांना स्थानबद्ध करण्यात येईल आणि नागपूर, पुणे आणि मुंबईत ठेवण्यात येईल. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. तसंच हॉटेलमध्ये जाणंही टाळावं. सुदैवाने 17 जणांना गंभीर आजार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. गर्दी टाळण्याचे आदेश मुंबई , नवी मुंबई , नागपूर , पुणे , पिंपरी चिंचवड जिम, जलतरण तलाव बंद मुंबई, नवी मुंबई, नागपूर आणि पुणे परिसरातली थिएटर्स बंद राहतील धार्मिक , राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द जिल्हाधिकारी यांनी काही परवानगी दिली असेल तर ती रद्द करावी