मुंबई, 28 फेब्रुवारी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan suicide case) वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या राजीनाम्याच्या रुपाने ठाकरे मंत्रिमंडळातील पहिली विकेट पडली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकार बॅकफूटवर गेले आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड प्रकरणावर तर भाष्य केलंच, पण त्याशिवाय राज्यातील कोरोनाची स्थिती, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन याविषयीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमची जबाबदारी न्यायाने वागणे ही असते. तपास हा झालाच पाहिजे आणि कोणी दोषी असेल तर शिक्षाही झाली पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. मात्र कोणाला मुद्द्याम अडकवता कामा नये. पोलिसांना नि:पक्ष चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या काळातही हीच पोलीस यंत्रणा होती. मात्र आता ते पोलिसांवरच अविश्वास दाखवत आहेत,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्याचा घटनाक्रम पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा मंजूर केला आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला मोठा झटका मानला जात आहे. आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जाऊन राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केला. ‘मी राजीनामा देतो पण चौकशी पुर्ण होऊ द्यात. त्यात मी दोषी आढळलो तर माझा राजीनामा मंजूर करा.’ अशी विनंती राठोड यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.