मुंबई, 26 मे : ’ काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं वक्तव्य आश्चर्यकारक आहे. कोरोनाच्या हाताबाहेर जाणाऱ्या परिस्थितीचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर फोडायचं आणि बाजूला व्हायचं असा त्यातून गंध येत आहे. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जात आहे अशा वेळेस मुख्यमंत्र्यांचे सहकारी त्यांची साथ सोडत आहेत असं लक्षात येतंय,’ असा गंभीर आरोप भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसंच यावेळी त्यांनी राज्यपाल भेटीवरून होणाऱ्या टीकालाही उत्तर दिलं आहे. ‘राज्यपाल शोभेची वस्तू नाहीत किंवा कटपुतली नाही. त्यांना संवैधानिक अधिकार आहेत. शिवसेनेनं सरकारमध्ये असताना कर्जमाफीचं निवेदन राज्यपालांना दिले होते तर आम्ही आता गेलो तर हरकत काय? मुख्यमंत्र्यांना सांगून काम होणार असेल तर राज्यपालांकडे जाण्याची वेळच येणार नाही,’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना लावला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे : केंद्र सरकारने 20 लाख कोटींचे पॅकेज राज्य सरकारला दिले त्याची माहिती देणार आहे महाराष्ट्रावर अन्याय होतोय असा आभास निर्माण केला जात आहे वारंवार खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत केवळ राजकारणासाठी वक्तव्य केले जातात त्याला फॅक्टसने उत्तर देणार आतापर्यंत केंद्राने राज्याला 28 हजार कोटींची मदत केलीय - फडणवीस कोरोनाच्या परिस्थितीतही राजभवन आणि मातोश्रीवर बैठकांचे सत्र सुरु आहे. या बैठकी कोरोनाच्या उपाययोजना संदर्भात आहेत की राजकीय खलबतांसाठी हे येत्या काळात कळेलच. पण या परिस्थितीत कोरोना या विषयाला प्राधान्य असायला हवा. भाजपमध्ये सरकार अस्थिर करण्याची कुठलीही हालचाल सुरू नाही. हे सरकार त्यांच्याच कर्माने जाईल. मात्र एक गोष्ट नक्की आहे की या सरकारकडून काही गोष्टी जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत ज्याच्यामुळे मूळ विषयापासून लोकांचं लक्ष हटेल. हे सरकार कव्हर फायरिंग करतंय. यामुळे मूळ विषयांना बगल देण्याचा प्रयत्न आहे. आज भाजपच्या एकही आमदाराला बोलावलं नव्हतं. मात्र अशा बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत. आता जे नेतृत्व आहे त्यांनी सक्षमपणे काम केले पाहिजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना फटाके न लावता त्यांना मदत केली पाहिजे. संपादन - अक्षय शितोळे