मुंबई, 27 जून : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेंच्या गटात आनंदाचं वातावरण आहे. हा शिंदे गटासाठी मोठा दिलासा आहे. या निर्णयानंतर आता शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. यादरम्यान एकनाथ शिंदेंनी ट्विट केलं आहे. शिंदे काय म्हणाले.. हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..! अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी आनंद व्यक्त केला आहे.
एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) गटातील 16 आमदारांना 11 जुलैपर्यंत दिलासा मिळाल्याने आता ते राज्यपालांकडे जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर राज्यपाल फ्लोअर टेस्ट घेऊ शकतात. यावेळी एकनाथ शिंदे गटाकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. शिंदे गट बहुमतात असल्याने महाविकास आघाडी सरकार पडू शकतं. यावेळी शिंदे भाजपसोबत जाणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी यापूर्वीही दिले आहेत. त्यामुळे भाजपने राज्यभरातील आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. फ्लोअर टेस्ट झाल्यास आमदारांची उपस्थिती अनिवार्य असते. अशावेळी आमदारांना पुढील काही दिवस महाराष्ट्राबाहेर जाऊ नये असंही सांगितलं जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपच्या गोटात आनंदी आनंद पसरल्याचं दिसत आहे. अनेक ठिकाणी नेते एकमेकांमध्ये मिठाई वाटत आहेत. 11 जुलैपर्यंत बंडखोर 16 नेत्यांवरील कारवाई रोखल्यामुळे एकनाथ शिंदेंना दिलासा मिळाला आहे. लवकरच ते सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचंही सांगितलं जात आहे. याशिवाय शिंदेंसोबत नसलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे.