'ही तर अफझल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद. महाराष्ट्राच्या दुष्मनांचे दफन करायला हवे'
मुंबई, 18 जुलै : शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. आता तर खासदार सुद्धा शिंदे गटाच्या गळाला लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची बैठक सुरू असताना शिवसेनेचे 14 खासदार हे ऑनलाईन बैठकीला हजर असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या आमदारांची मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये शिवसेनेचे खासदार उपस्थितीत असल्याचा मोठा धक्का शिवसेनेला बसला आहे. शिवसेनेचे 14 खासदार हे शिंदे गटाच्या बैठकीला हजर आहे. एकूण18 खासदारांपैकी 14 खासदार हे शिंदे गटाच्या बैठकीला हजर असल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार हे शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा रंगली होती. आज या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीच शिवसेनेला संपवण्याचा दिल्लीत कट रचला आहे. शिवसेनेच्या खासदारांनावर ईडी आणि सीबीआयच्या कारवाईचा दबाव टाकला जात आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे. दरम्यान, कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. धैर्यशील माने आणि संजय मंडलिक शिंदे गटात सामील होणार आहे. लवकरच अधिकृत भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील मेळाव्याला दोघांनाही दांडी मारली होती. रामदास कदमांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ तर दुसरीकडे, शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. कदम यांनी एक पत्र लिहून आपण नेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र, बाळासाहेबांच्या निधनानंतर निधनानंतर शिवसेना नेते पदाला कुठल्याही प्रकारची किंमत दिली नाही. हे मला पाहण्यास मिळाले, अशी टीका कदम यांनी केली. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला आणि माझ्या मुलगा आमदार योगेश कदम याला अपमानीत करण्यात आले आहे, अशी टीकाही कदम यांनी केली. विधानसभेच्या निवडणुकीआधी मला अचानक मातोश्रीवर बोलावून घेतले आणि मला आदेश दिले की यापुढे तुमच्यावरती कोणीही कितीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले, मातोश्रीवर कोण काही बोललं तरी आपण मीडियासमोर अजिबात जायचे नाही. कुठलेही वक्तव्य करायचे नाही. याचे कारण अजूनही मला कळू शकले नाही. मागील 3 वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्याचा मार मी सहन करत आहे, अशी नाराजीही कदम यांनी बोलून दाखवली.