वसई, 13 जुलै : कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका, असं आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र असं असतानाही काही अतिउत्साही नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. मात्र अशाच पर्यटनासाठी बाहेर पडलेले वसईचे काही नागरिक मोठ्या संकटात अडकल्याची घटना घडली. पर्यटनाची मजा लुटण्यासाठी वसई रानगाव येथून 15 पर्यटक रविवारी देवकुंडी परिसरात गेले होते. यात 4 महिला आणि 11 पुरुषांचा समावेश होता. दुपारी अचानक देवकुंडी नदीला पूर आल्याने 7 जण हे नदीच्या पात्रात अडकले होते. या ठिकाणी मोबाईलचे नेटवर्क नसल्याने पर्यटक कुणालाही मदतीला बोलावू शकले नाही. अडचणीत सापडलेल्या या पर्यटकांचा आवाज गावतील काही तरुणांनी ऐकला आणि त्यांच्या मदतीला धावून गेले. या तरुणांनी या सातही पर्यटकांना नदीच्या पात्रातून सुखरूप बाहेर काढले. या पर्यटकांना कामण देवकुंडी गावातील नागरिकांनी एकप्रकारे जीवनदानच दिले आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनास बंदी असताना अनेकजण हे बाहेर निघत असून पोलिसांनी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.