राजू शेट्टी यांचा शिंदे सरकारवर प्रहार
कोल्हापूर, 22 ऑक्टोबर : परतीच्या पावसाने राज्यभर धुमाकूळ घातला आहे. यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांची काढणी काही दिवसांवर आली असताना असा नास झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागाची पाहणी केली. यावेळी अस्मानी व सुल्तानी संकटामुळे शेतकऱ्यांना 1 रूपया म्हणजे गाडीच्या चाकासारखा वाटू लागला आहे. याची किंमत 50 खोकेवाल्यांना कधी समजणार? असा प्रश्न राज्य सरकारला विचारला आहे. सोबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचाही समाचार राजू शेट्टी यांनी घेतला.
50 हजार रक्कम शेतकऱ्यांसाठी डोंगरावएवढी : शेट्टी राजू शेट्टी यांनी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, की मी संजय पाटील यांच्या शेतामध्ये उभा आहे. त्यांच्या शेतात फ्लॉवरचं पिक होतं. 20 गुंठ्याच्या या प्लॉटमधील पिकाची अवस्था दयनीय झाली आहे. जवळपास 22 हजार रुपये या पिकासाठी खर्च करण्यात आले होते. दोन आठवड्यात सर्व फ्लॉवर मार्केटमध्ये जाणार होता. मात्र, पावसामुळे या पिकाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. सोन्यासारखं पिक पाण्यामुळे सडायला लागलं आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणतात अजून ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलेली नाही. अब्दुल सत्तार साहेब, ज्या छोट्या शेतकऱ्याची जमीन 20 गुंठे आहे, त्याला 50 हजार रक्कम डोंगराएवढी आहे. कदाचित 50 खोक्याच्या पुढे ती कमी असेल. मात्र, या शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून रुपया म्हणजे गाडीच्या चाकाएवढा आहे. त्यानंतरही तुम्ही शेतकऱ्यांची व्यथा समजून घेणार नसाल तर या शेतकऱ्यांच्या डोक्यात आग भडकल्याशिवाय राहणार नाही. त्यामध्ये कोणकोण भस्म होईल हेही सांगता येणार नाही. वाचा - अवघ्या 7 मिनिटात उरकला कृषीमंत्र्यांचा नुकसान झालेल्या शेतीचा पाहणी दौरा.. नुकसानीचे 15 दिवसात पंचनामे होतील: अब्दुल सत्तार मी स्वतः सगळीकडे दौरा करणार असून, एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही. तसेच येत्या 15 दिवसांत पंचनामे होतील अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलीय. मका, कापूस सोयाबीन नुकसान झालंय, कॅबिनेटमध्ये याबाबत चर्चा झाली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भावना समजून घेत आहेत. अनेक जिल्ह्यात ढगफुटी, पावसाने नुकसान केले आहे. पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या करणे हा पर्याय नाही. पंचनामे करण्यासाठी सॅटेलाईट पाहणी पद्धत तयार करतोय. भविष्यातील अडचणी यातून दूर होतील. मात्र, यावेळेस ग्राउंड वर जाऊनच पंचनामे करावे लागतील असेही कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
पीक विमा कंपनी सुलतानी संकट निर्माण करताय, 72 तासात नुकसान कळवणे शक्य नाही, ऑफलाईन तक्रार सुद्धा देत यायला हवी, कुणी उशिरा माहिती दिली तरी शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती घ्यावी लागेल, पीक विमा कंपनी मनमानी करू शकणार नाही, असेही मंत्री सत्तार यांनी म्हटले.