'कोश्यारी हटवा, दिल्लीला परत पाठवा' म्हणत राज्यभरातील पदाधिकारी कोश्यारी यांच्याविरोधात निदर्शने करुन निवेदने देण्यात येतील
मुंबई, 27 नोव्हेंबर : ‘छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहे’ असं म्हणून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी वादाला तोंड फोडले होते. पण, आठवडा उलटला तरीही राज्यपालांनी साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांनी शिंदे सरकाराला कडक इशारा दिला आहे. भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? असा थेट सवाल संभाजीराजे यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
राज्यपालांवर जर कोणतीही कारवाई होणार नसेल तर महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच, असा इशाराच संभाजीराजे यांनी दिला आहे. स्वराज्य संघटना राज्यपालांचे कार्यक्रम उधळणार तर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी नुकतीच पत्राद्वारे भूमिका जाहीर केली. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून राज्यपालांना हटविण्यात यावे अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केल्यानंतर कार्यवाही झाली नसल्याने संभाजीराजेंनी पुन्हा सरकारचे कोशारींच्या वक्तव्याला समर्थन आहे का हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर स्वराज्य संघटना मैदानात उतरली आहे. ‘कोश्यारी हटवा, दिल्लीला परत पाठवा’ म्हणत राज्यभरातील पदाधिकारी कोश्यारी यांच्याविरोधात निदर्शने करुन निवेदने देण्यात येतील तसंच राज्यपालांचे राज्यभरातील कार्यक्रम स्वराज्य संघटना उधळून लावेल असा इशारा स्वराज्याचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांनी दिला आहे. काय म्हणाले होते राज्यपाल? ‘आम्ही जेव्हा शिकत होतो, ते आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील’ असं म्हणत राज्यपालांनी महापुरुषांची तुलना नितीन गडकरी आणि शरद पवारांसोबत केली.