मुंबई, 26 नोव्हेंबर : 26 नोव्हेंबर 2008 ची ती रात्र म्हणजे मुंबईकरांच्या जखमा कधीच नं मिटवणारी होती. देशातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला त्या रात्री मुंबईवर झाला होता. एका रात्रीत 164 निष्पाप लोकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर हैदोस माजवणाऱ्या दहशतवादी अजमल कसाबला गोळीबार करताना प्रत्यक्ष पाहिलेल्या अविनाश यांना आजही त्या आठवणीनं अंगावर शहारा येतो. त्यांच्या आयुष्याची दोरी बळकट होती म्हणूनच ते त्या रात्री कसाबपासून वाचले. कसे वाचले अविनाश? मुळचे बिहारचे असलेले अविनाश गेल्या 35 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर पेपर विक्रीचा व्यवसाय करतात. 14 वर्षांपूर्वी झालेला दहशतवादी हल्ला त्यांनी स्वतःच्या डोळ्यादेखत पाहिला. अजमल कसाब आणि त्याच्यासोबत असलेल्या दहशतवाद्याच्या गोळ्यांनी अनेकजण त्या रात्री मारले गेले. ती रात्र त्यांच्यासाठी भयानक होती. …अचानक फायरिंग सुरू झाली अविनाश यांनी सांगितलं की, ’ मी रोजच्या प्रमाणे माझं काम संपवलं. सर्व पेपर एकत्र करुन स्टेशनजवळच्या डिलरकडे गेलो. रात्रीचे नऊ वाजले असतील. स्टेशनच्या पेपर स्टॉलवरून पेपर, पुस्तकांचा हिशोब करून बाहेर जाताना माझ्या मित्रानं चहा पिण्यासाठी हाक मारली. आम्ही चहा प्यायलो आणि तिथून मी निघालो. मी स्टेशनच्या बाहेर येतो तेवढ्यात लोकांच्या ओरडण्याचा आवाज मला ऐकू आला. 26/11 च्या रात्री काय घडलं? हल्ल्यात जखमी झालेल्या पत्रकारानं सांगितला थरार ‘कसाब माझ्या समोर होता’ सर्वांची धावपळ सुरू झाली. फायरींगचा आवाज यायला लागला. मी देखील लोकांच्या बरोबरीने तिथून जीव वाचवण्याचा प्रयत्नाने धावलो आणि कडेला येऊन उभा राहिलो. त्याचवेळी कसाब माझ्या समोर होता. मला वाटलं की आता माझी पण मरणाची वेळ जवळ आली आहे. पण तो तिथून पळत निघून गेला आणि मी देवाचे आभार मानले पण नंतर कळलं की माझ्या चहावाल्या मित्राचा गोळीबारात मृत्यू झाला. रोजगारासाठी अविनाश काका बिहारहून मुंबईत आले आणि पेपर विक्रीचा व्यवसाय त्यांनी सुरु केला. मुंबईत 2008 चा हा हल्ला त्यांनी आपल्या डोळ्यांदेखत पाहिला.एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतरही अविनाशच्या मनात गावी परत जाण्याचा विचार आला नाही. आजही ते त्याच ठिकाणी पेपर विक्री करतात.